मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडे यांच्या विधानाबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी, “मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचं नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.