मुंबई- भाजपला 140 पेक्षा अधिक जागा मिळतील असा मला विश्वास आहे. राज्यातील मजबूत विरोधीपक्ष नसल्याचा आम्हाला निश्चितच फायदा मिळेल. विधानसभेत जाता आले असते तर मला आनंद झाला असता. विधानसभेशी माझे जवळचे नात असल्याने नव्या विधानसभेत मी नसेल याची खंत आयुष्यभर राहिल, अशी नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मीसुद्धा गेले अनेक दिवस पक्षावर नाराज होतो. मी असा काय गुन्हा केला असेल, म्हणून पक्षाने माझे तिकीट नाकारले. याबाबतच्या कारणांचा मी अजूनही शोध घेत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलणार आहे.
खडसे म्हणाले, माझ्याऐवजी माझी मुलगी रोहिणी हिला पक्षाने उमेदवारी दिली. रोहिणीला उमेदवारी देणे हा पक्षाचा निर्णय होता. ती मोठ्या मतफरकाने निवडून येईल. कोणताही कार्यकर्ता निवडून आल्यावर मला त्याचा आनंदच होईल.
पक्षाबाबत खडसे म्हणाले की, भाजपचे संघटन मजबूत आहे. राज्यात पुन्हा एकदा आम्ही बहुमताचे सरकार आणू. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. देशाने आणि राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. तसेच आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. भाजपला सहजपणे 135 ते 140 जागा मिळतील.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुन्हा खंडण केले. खडसे म्हणाले की, ज्या जमिनीच्या व्यवहारावरुन माझ्यावर आरोप होत आहेत, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मुळात ती वादग्रस्त जमीन सरकारची नसून एमआयडीसीचीदेखील नाही. तसेच मी कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही.