मंत्री जयंत पाटील; राणेंच्या टिकेकडे लक्ष देऊ नका
इस्लामपूर (प्रतिनिधी) –खडसेंसह अनेकजण भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मात्र, एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक असल्याचे मत व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, खडसे नाराज असले तरी त्यांचा पर्याय राष्ट्रवादी पक्ष असेल यावर माझी त्याच्याशी अजून चर्चा झाली नाही. तसेच नारायण राणेंच्या टिकेला फार मनावर घेण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी राणेंच्या टिकेला प्रतिउत्तर दिले.
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील कासेगाव या त्याच्या मूळ गावी प्रथमच आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. जयंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. जयंत पाटील यांनी कासेगावमधील राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. सरकार स्थगिती सरकार आहे अशी टीका करणाऱ्या नारायण राणेंचाही जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. राणेच्या टिकेला फार मनावर घेण्याची गरज नाही, काही दिवसातच गतीने काम करणारे सरकार म्हणून राणेच या सरकारचे कौतुक करतील असा मला विश्वास आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. खातेवाटपाचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे,
मुख्यमंत्र्यांची सर्वाशी सल्लामसलत चालू आहे. एक दोन दिवसात खाते वाटपाचा निर्णय होईल. जयंत पाटील म्हणाले, “प्रत्येक आनंदाच्या क्षणी माझे मतदार नेहमीच पाठीशी असतात. कठीण प्रसंगी हेच नागरिक मला साथ देतात. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अवधी गेल्याने मला मतदारसंघात येता आले नाही. त्यांना भेटायला आज आलो आहे. प्रतिकूल परिस्थितीत अनेक जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला. पण सामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने राज्यात कमी उमेदवार उभे करून दोन नंबरची मते घेतली. शरद पवार साहेबांच्या पाठीशी कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहिले