नवी दिल्ली – देशातील मुलींना 18 वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अधिकार आहे, त्याद्वारे त्या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतात मग याच वयाच्या मुलांना लग्नाचा अधिकार का नाही असा सवाल एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला केला आहे.
मोदी सरकारने मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 इतके करण्याचा निर्णय घ्यायचे ठरवले आहे त्यावरून त्यांनी हा सवाल केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले की 18 वर्षाच्या मुलीला आमदार, खासदार निवडून देण्याचा अधिकार असतो. त्यांना त्या वयात स्वत:चा व्यवसायही करण्याचा अधिकार असतो पण त्यांना लग्नाचा अधिकार असणार नाहीं हे चुकीचे आहे. माझे तर म्हणणे असे आहे की 18 वर्षाच्या मुलालाही लग्नाचा अधिकार दिला गेला पाहिजे. मुलांसाठी लग्नाचे वय किमान 21 असणे सध्या कायद्याने बंधनकारक आहे. ती वयोमर्यादाही घटवली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की मुलींवर असली बंधने लादण्यापेक्षा सरकारने मुलींच्या व महिलांच्या विकासासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. पुर्वी देशात अत्यल्प वयात लग्न होत असे पण आता मात्र शिक्षणामुळे आणि काही प्रमाणात आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे लोकांमध्ये जागृती आली आहे. त्यामुळे आता बाल विवाह फारसे होत नाहीत असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की अमेरिकेतील काहीं राज्यात मुलींना वयाच्या चौदाव्या वर्षीच विवाहाचा अधिकार आहे. ब्रिटन आणि कॅनडा मध्येही मुलींना वयाच्या सोळाव्या वर्षी विवाहाचा अधिकार आहे असे त्यांनी नमूद केले.