नवी दिल्ली – देशात आतापर्यंत करोनाचे 66 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून सर्वात जास्त कोविडचे रुग्ण बरे होणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानावर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशाच्या रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्य असून तो 88 टक्के इतका आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा साडे आठ पट जास्त असल्याचे यात म्हटले आहे.
गेले सहा आठवडे देशात करोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटत असून, 24 तासांत करोनाच्या 55 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर एक महिन्यापूर्वी रोज 90 हजारापेक्षा जास्त रुग्णांची भर पडत होती, असे या निवेदनात म्हटले आहे.
देशात करोना ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील घट होत असून सध्या ती 7 लाख 72 हजार आहे. तसेच गेल्या 24 तासांत 66 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर 579 रुग्ण दगावले, असे यात म्हटले आहे.