संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील ओझर खुर्द येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच शेतकऱ्यांचा तब्बल 8 एकर ऊस जळाल आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि.6) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
रविवारी दुपारी साडेबारा ते 1 वाजेच्या सुमारास मनोली-ओझर रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक 39 मधील दौलत मंगू बनवाले यांचा 1 हेक्टर, बाबासाहेब मंगू बनवाले यांचा 1 हेक्टर, गट नंबर 41 मधील राजेंद्र बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे, संजय बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे, तसेच प्रभाकर बाबूराव पराड यांचा 2 एकर ऊस विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने त्यातून निघालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला.
उसाला आग लागल्याची माहिती मिळताच संगमनेर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. याप्रसंगी स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली असली, तरी येथील पाच शेतकऱ्यांचे तब्बल 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. या शेतकऱ्यांना महावितरणने भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी सरपंच पुंजाहरी शिदे, ग्रामपंचायत सदस्य बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजूळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.