नवी दिल्ली – सरकारने सर्व सरकारी योजना आणि कामांची माहिती आधीच लोकांना दिल्याने आता माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवण्याची गरज कमी झाली आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. माहिती आयुक्तांच्या चौदाव्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
या अधिकारामुळे सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी केली गेली असल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की हा कायदा जेव्हा तयार केला जात होता त्यावेळी त्याचा गैरवापर होईल अशी शंका व्यक्त केली गेली होती. पण गेल्या पंधरा वर्षात माहिती अधिकाराचे जे लाभ झाले ते पहाता गैरवापराची भीती नाहीशी झाली आहे असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की सरकारने अनेक योजना ऑनलाईन स्वरूपात आणल्या आहेत. त्याच वेळी त्यांना हवी असलेली माहिती सादर केलीजात आहे. तसेच त्यांच्या अर्जाचे प्रकरण कुठवर आले आहे याचीही माहिती अर्जदाराला देण्याची ऑनलाईन सोय करण्यात आली आहे.
अधिकाधिक माहिती लोकांसाठी खुली करून माहिती अधिकाराची गरजच कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.