नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशात डाळींचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर उत्सवांच्या काळात हे दर आणखी वाढू नयेत, याकरिता केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त अनुदानावर डाळी उपलब्ध केल्या आहेत.
ज्या डाळी केंद्र सरकाराने उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामध्ये उडीद आणि तूर डाळीचा समावेश आहे. 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या डाळी किमान आधारभूत किंमत अधिक दहा टक्के मूल्यावर राज्यांना उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पुढे केला होता. आता केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीवर उडीद आणि तूरडाळ राज्यांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता उडीद डाळ 79 रुपये ते 81 रुपये प्रति किलो दरावर उपलब्ध करण्यात आली आहे.
तूर डाळ 85 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डाळी कमी दरावर उपलब्ध केल्या असल्या तरी आतापर्यंत राज्यांनी केंद्र सरकारकडे डाळींसाठी मागणी नोंदविलेली नाही. डाळींचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा त्रास होतो.
यासाठी केंद्र सरकारने 2015-16 पासून डाळींचा अतिरिक्त साठा करण्याचे ठरविले आहे. यावर्षी केंद्र सरकार 20 लाख डाळींचा साठा करणार आहे. भाव वाढल्यानंतर केंद्र सरकार या डाळी योग्य दरावर राज्य सरकारना उपलब्ध करते. दरवाढ होऊ नये यासाठी सरकारचे परिस्थितीकडे लक्ष आहे.
अर्धा व एक किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध
राज्य सरकार मोठ्या प्रमाणात किंवा अर्धा व एक किलोच्या पॅकमध्ये या डाळी केंद्र सरकारकडून घेऊ शकतात. त्यामुळे राज्यांना या डाळी स्थानिक पातळीवर वितरित करण्यास मदत होऊ शकणार आहेत. राज्य सरकार रेशन दुकानातून किंवा इतर माध्यमातून या डाळी ग्राहकांना उपलब्ध करू शकेल.