विद्यार्थ्यांनी घेतली समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प शपथ
मुंबई: ग्लोबल वॉर्मिंगचे संकट मोठे आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच वसुंधरेच्या रक्षणासाठीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती सभागृहात विद्यार्थ्यांनी ‘समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प’ शपथ घेतली. या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण विभागामार्फत आज राज्यभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासह भारतावरही त्याचा परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे अनेकांना जीव गमवावे लागतात. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच पर्यावरणाविषयी जागृती निर्माण केली तर भविष्यात पर्यावरणाची चांगली स्थिती पाहावयास मिळेल. भावी पिढीसाठी आपण पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. भावी पिढीचा तो अधिकार आहे. पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवावेत. २१ व्या शतकात मानवाने स्वतःच्या सुखासाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला. आता पर्यावरण रक्षण ही सर्वांची सामूहिक जवाबदारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक वाढदिवसाला किमान एक झाड लावा – पर्यावरण मंत्री
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यावरण संवर्धन जनजागृती करण्यापूर्वी सुरुवात स्वतःपासून करावी. प्रत्येक वाढदिवसाला किमान एक तरी झाड लावावे आणि त्या झाडाची निगा राखावी. राज्याची प्रगती करण्यासाठी पर्यावरण संकल्पाची शपथ घेऊन त्याची प्रभावीपणे अंबलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. स्वछता राखणे, प्लास्टिक न वापरणे असा संकल्प करावा असे सांगून आपण प्रामाणिकपणे वसुंधरेच्या रक्षणाची कर्तव्ये पार पाडली तरच जगाला मार्गदर्शन करू शकू असे त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना समृद्ध पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.