मुंबई : पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
एमपीएससीला स्वातंत्र्य हवं पण स्वैराचार नको, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर निशाणा साधला
दरम्यान MPSC च्या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. मोठ्या अपेक्षेने मुलं स्पर्धा परीक्षा देतात आणि दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन याला अधिक कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी सरकारला दिला.
एमपीएससी संदर्भात राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करू द्यायला हवे. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत, पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. अनेक तरुण यामुळे भरडले जात असल्याचं फडणवीस म्हणाले.