मुंबई – नालाबंडींगमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. फळबाग योजनेंतर्गत 42 हजार हेक्टर क्षेत्रावर मनरेगाअंतर्गत फुल शेती, द्राक्ष फळबाग लागवड केली आहे. ती पुढे वाढवून 1 लाख हेक्टर करण्याचा शासनाचा मानस आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेत दिली.
फलोत्पादनमंत्री भुमरे म्हणाले की, सर्वांना रोजगार मिळावा यासाठी गेल्यावर्षी 2 हजार 118 कोटी रुपये खर्च झाला आहे. यावर्षामध्ये 2 हजार 500 कोटी खर्च करण्यात येणार आहे.
मनरेगा अंतर्गत शेतीसाठी मातोश्री पाणंद रस्ता, जोडरस्ता करण्याचे विचाराधीन आहे.हे रस्ते रक्त वाहिन्यांसारखे काम करतात. राज्यात दर्जेदार रस्ते करण्यात येणार आहेत. राज्यात 15 ते 16 हजार किलोमीटरच्या रस्त्याला मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गाव समृद्धी योजनेंतर्गत गुरांसाठी शेड, गोठे देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या ज्या चांगल्या योजना आणता येतील त्या आणण्याचा शासनाचा मानस आहे, असेही फलोत्पादनमंत्री भुमरे यांनी सांगितले.