नवी दिल्ली – ओमायक्रॉनमुळे जागतिक पातळीवर पुरवठा शृखंलेत पुन्हा एकदा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी आशियाई विकास बॅंकेने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा आपला मागील अंदाज कमी केला आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत बॅंकेने वाढीचा अंदाज दोन वेळा घटवला आहे. भारत दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या काही महिन्यांमध्ये उद्योगांना पुरवठा साखळीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने विकासदरात 0.3 टक्क्याची घट करण्यात आली आहे.
नवीन अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 9.7 टक्के राहील, असा कयास आशियाई विकास बॅंकेने (एडीबी) व्यक्त केला. याआधी चालू वर्षासाठी बॅंकेने 10 टक्के विकास दर राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
तर सप्टेंबरमध्ये, करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकूल परिणामाच्या शक्यतेने, चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 11 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.