मुंबई – महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आज रेपो या आपल्या प्रमुख व्याजदरात 0.35% ची माफक वाढ केली असली तरी यामुळे विकासावर परिणाम होईल असे वाटत असलेल्या गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 215 अंकांनी कमी होऊन 62,410 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी म्हणजे 0.44 टक्क्यांनी कमी होऊन 18,560 अंकावर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर एनटीपीसी, बजाज सर्व, इंडसइंड बॅंक, टाटा स्टील, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन अँड ट्यूबरो, ऍक्सिस बॅंक, आयटीसी, महिंद्रा या कंपन्याच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यां पर्यंत वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली असल्याचे दिसून आले.
रिझर्व्ह बॅंकेने विकास दर कमी होऊन 6.8 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचाही गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, विकासदर कमी झाल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे पुढील सहा महिने कंपन्या जास्त परतावा देणार नाहीत असे विक्री करणाऱ्या गुंतवणूकदाराचे मत झाले आहे.
व्याजदराशी संबंधित रिऍल्टी, ग्राहक वस्तू आणि वाहन क्षेत्राचे आज बरेच नुकसान झाले. मोठ्या कंपन्यांबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप आणि मिडकॅप 0.44% पर्यंत कमी झाले.
जागतिक बाजारातूनही आज नकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याचे धाडस केले नाही. अमेरिका व्याज दरात वाढ करण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाल्यामुळे काल परदेशी संस्था गुंतवणूकदारांनी 635 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.