तीन कार्यालयांत रुग्ण आढळले : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धास्तीत वाढ
– डॉ. राजू गुरव
पुणे – शिक्षण विभागाच्या तीन कार्यालयातील तीन लिपिकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे. कार्यालये सॅनिटाईज करुन घेण्यात आली असून प्रत्येकाने मास्कचा वापर केलाच पाहिजे व सोशल डिस्टन्सिंगेचे नियम पाळावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर या पाचव्या टप्यात (अनलॉक 1) शासनाने कार्यालयात 15 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचे आदेश लगेचच जारी केले. अन्यथा, संबंधिताची अर्जित रजा विनावेतन रजा म्हणून नियमित करण्यात यावी व त्याप्रमाणेच त्यांना वेतन करण्याबाबतचे आदेश शासनाच्या वित्त विभागाने काढले आहेत.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षण विभागातील विविध कार्यालयांचेही कामकाज सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कधी उपस्थित रहायचे आहे याचे वारनिहाय वेळापत्रक निश्चित करुन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. गैरहजर राहिल्यास वेतन कपात होईल, या भितीने अधिकारी, कर्मचारी ठरवून दिलेल्या दिवशी कार्यालयात येत असल्याचे चित्र आहे.
प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळपास असलेल्या विविध भागातून अधिकारी, कर्मचारी कार्यालयात येत असतात. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या शालेय पोषण आहार कार्यालयातील एका लिपिकाला करोनाची लागण झाली. शिक्षण आयुक्त कार्यालयातील एका लिपिकाची रेशनिंग दुकानावर ड्युटी लावण्यात आली होती. त्यालाही करोना झाल्याचे आढळून आले, त्यापाठोपाठ पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील एक लिपिकही करोनाबाधित असल्याची बाब समोर आली आहे.
त्रास, होत असल्याचे जाणवल्यामुळे हे तीघेही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. ते आठ-दहा दिवस कार्यालयाकडे फिरकलेच नव्हते. करोनाबाधित आढळलेल्या या तीनही कार्यालयात तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. तीन-चार दिवस कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. कार्यालय व जवळचा परिसर सॅनिटाईज करून घेण्यात आला आहे.
शासनाच्या नियमावलीप्रमाणे शिक्षण विभागातील सर्व कार्यालयांना दक्षता बाळगण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. त्याची सर्वांनी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शाळांमधील शिक्षक, कर्मचारी, पालक, संघटनांचे पदाधिकारी यांनी कोणत्याही कार्यालयांमध्ये येऊन विनाकारण गर्दी करू नये. फोन, ई-मेल, व्हॉटसअपद्वारे आपली कामे करावीत. प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली तरच करोनाच्या संकटावर मात करता येणे शक्य होणार आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त