प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 – शहरातील काही माध्यमिक शाळांतील शिक्षकांची तब्बल आठ वर्षांपर्यंत थकलेली वेतन बिले शालेय शिक्षण विभागाने अदा केली आहेत. यासाठी विभागाला 90 लाख रुपये मोजावे लागले आहेत. दरम्यान, काही बड्या अधिकाऱ्याच्या नात्यातील शिक्षकांचाही थकीत वेतन बिलामध्ये समावेश असल्याने ही कार्यवाही मेहरबानीतून करण्यात आल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
शिक्षण विभागात विविध पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या नात्यातील व्यक्ती अनुदानित शाळांमध्ये कार्यरत आहेत. कार्यालये वेगवेगळी असली तरी अधिकाऱ्यांचे एकमेकांशी लागेबांधे हे असतातच. अधिकाऱ्यांच्या जीवावर त्यांचे सगेसोयरे असलेले शिक्षक रुबाब दाखवित असतात. संबंधित शिक्षकांना पाहिजे तेव्हा सुट्ट्या तसेच इतर सवलतींचा लाभ मिळतो, असे काही शिक्षकांकडूनच बोलले जात आहे.
2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी असतानाही शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात अधिकाऱ्यांच्या नात्यातील मंडळींची शिक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या. याबाबत काहींनी तक्रारीही दाखल झाल्या होत्या. मात्र त्यातून विविध दबाव तंत्राचा वापर झाल्याने तक्रारी मागे घेण्यात आल्या. त्यानंतर शाळा, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मिळविण्यासाठी खटपट करुन वेतन सुरू करण्यासाठीही आटापिटा करण्यात आला होता.
2011 ते 2019 या कालावधीत संबंधित शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी काही कारणास्तव मिळाले नाहीत. ते मिळाल्यानंतर त्यांची थकीत वेतनाची देयके शाळांमार्फत तयार करुन ती वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडे सादर करण्यात आली. वेतन पथकाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर पुढे माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. प्रस्ताव मंजूर करुन शिक्षकांना बिलेही अदा करण्यात आली आहेत. शाळांनी वर्षानुवर्ष थकीत वेतनाची बिले सादर केली नाहीत. यात नक्कीच काही तरी गौडबंगालही असणार आहे.
अधिकाऱ्यांची हाताची घडी, तोंडावर बोट…
पुण्यातील काही ठरावीक माध्यमिक शाळांमधील एकुण 23 शिक्षकांच्या 90 लाख रुपयांच्या थकीत बिलांचा विषय मार्चमध्ये घाईघाईन मार्गी लावण्यात आला. यात 8 हजार रुपयांपासून ते 21 लाख रुपयांपर्यंतच्या रकमांचा समावेश होता. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांना माहिती विचारली असता त्यांनी काहीच माहित नसल्याचा आव आणत मौन बाळगले.