शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण आणि शरद पवारांच्या अलीकडच्या काळातील पत्रकार परिषदा त्यांचा भाजपच्या विरोधात आक्रमकपणा वाढल्याचे निदर्शक आहेत. एरव्ही होता होईल तो मुख्यमंत्री किंवा पवार हे भाजप आणि मोदी सरकारच्या बाबतीत जरा सबुरीनेच बोलताना दिसत होते. त्यातून शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाचेही पुन्हा भाजपशी कधीही सूत जुळू शकते अशा कंड्याही वेळोवेळी पिकवल्या जात होत्या.
हे सरकार कधीही पडू शकते असे जे दावे भाजपकडून सतत केले गेले त्यालाही ठाकरे, पवारांच्या भाजपविषयीच्या सबुरीच्या धोरणाचाच आधार असावा. पण गेल्या काही दिवसांत मात्र ठाकरे आणि पवार हे अत्यंत आक्रमकपणे भाजपच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपची चांगलीच चिरफाड केलेली पाहायला मिळाली. त्यांच्या भाषणात भाजपविषयीचा इतका मनस्वी तिटकारा या आधी पाहायला मिळाला नव्हता.
ठाकरे यांनी रोजच राजकीय भाष्य करून नाहक वाद निर्माण करण्याचे सातत्याने टाळले आहे. पण जेव्हा केव्हा ते पक्षाच्या राजकीय व्यासपीठावरून बोलतात त्यावेळी मात्र ते मागची सारी कसर भरून काढत असतात. पण दसरा मेळाव्यात त्यांनी जी चौफेर टोलेबाजी केली ती भाजपची वासलात लावणारी होती. त्याहीपेक्षा त्यांच्या या भाषणातून आता भाजप आणि शिवसेना यांच्यात कधीही सूत जुळणार नाही याचीच स्पष्टोक्ती दिसून आली.
ईडी, सीबीआय किंवा आयटी या यंत्रणांमार्फत छापे टाकायचे आणि काटा काढायचा अशी पद्धत आता चालणार नाहीत, असे भाजपला त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावताना त्यांनी पहिल्यांदाच भाजपला आमचे सरकार पाडूनच दाखवा, असे जाहीर आव्हान दिले आहे. या आधी त्यांनी भाजपला असे आव्हान दिल्याचे कधी ऐकिवात आले नव्हते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा आब राखत वेळोवेळी संयमी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले आहे. पण जेव्हा ते शिवसेनेच्या व्यासपीठावर येतात त्यावेळी मात्र ते हातचं काही राखत नाहीत.
त्यांनी फडणवीस आणि मोदींवरही जोरदार घणाघात केला. त्यांच्या या भाजप विरोधातल्या आक्रमकपणामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही आता आपले भाजपशी कधीच पुन्हा सूत जुळणार नाही याचा स्पष्ट संदेश गेला आहे. त्यानुसार आता शिवसेनेतूनही भाजप विरोधात आक्रमक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आजच सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी अशीच सडेतोड प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गुजरात दंगलीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींची पाठराखण केली नसती तर आज मोदींचे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते!
तिकडे संजय राऊतही आता नव्याने आक्रमक झालेले दिसताहेत. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रथमच भाजपच्या विरोधात आक्रमक मोर्चा उघडला आहे. एरव्ही त्यांचीही वक्तव्ये मोदी किंवा भाजपला सांभाळून घेण्याच्याच धोरणाची असायची. पण आता मात्र त्यांनीही मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे. काल पिंपरीच्या सभेतही त्यांनी भाजप हटावची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधूनच करा, अशी हाक दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून आकसाने कारवाई सुरू होती.
त्यांच्यावर आतापर्यंत किमान पाच वेळा छापेमारी करण्यात आली असून अनेक वेळा त्यांना ईडीकडून समन्सही जारी केली गेली आहेत. तरीही त्याविषयी पवारांच्या तोंडून भाजप सरकारच्या विरोधात फार आक्रमक भूमिका मांडली गेलेली दिसली नव्हती. पण परवाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुख प्रकरणावरून खुलेपणाने मोदी सरकारच्या विरोधात धारदार भूमिका घेतलेली दिसली. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी भाजप विरोधात अशी आक्रमक भूमिका घेण्याला मोठे राजकीय महत्त्व आहे.
भाजपकडून सतत आकस दिसत असतानाही हे दोन्ही पक्ष प्रमुख ठामपणे त्यांच्या विरोधात अजून काहीच कशी भूमिका घेत नाहीत, असा प्रश्न सतत विचारला जायचा. भाजपशी या दोन्ही पक्षांची आतून हातमिळवणी आहे काय, असाही प्रश्न काही राजकीय निरीक्षक आडून आडून उपस्थित करायचे. दोन्हीही पक्ष प्रमुख भाजपच्या संबंधात अशी कठोर आणि ठाम भूमिका जोपर्यंत घेताना दिसत नव्हते, तोपर्यंत अशा शंकाकुशंकांना नेहमीच वाव राहात होता.
आज केंद्रात भाजपचे सरकार असले, तरी महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्याची महत्त्वाची सूत्रे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहेत. असे असतानाही भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणाला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊन त्यांना ठोशाला ठोसा पद्धतीने राजकारण का करता येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. देशात कोणताही मोठा वादाचा मुद्दा उपस्थित झाला की मुंबईच्या बॉलीवूडमधील व्यक्तींवर नेम धरून कारवाई केली जायची आणि त्याचा मोठा बभ्रा निवडक मीडियाकडून सुरू व्हायचा.
रिया चक्रवर्तीच्या घरी सापडलेला 10-12 ग्रॅम गांजा हा देशातला त्या काळातला सर्वात मोठा गहन विषय मीडियामार्फत बनवला गेला होता. सुशांतची आत्महत्या या विषयाच्या बाबतीत तर कहरच झाला होता. ही सारी प्रकरणे आणि त्या मागचे राजकारण सामान्य माणसालाही स्पष्टपणे समजत असताना महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यांचे नेते मात्र इतकी गुळमुळीत भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही पडत होता. पण आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षप्रमुखांनी भाजपच्या विरोधातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे लोकांपुढे आणली आहे. हे दोन्ही पक्ष आता भाजपशी सरळ दोन हात करायला सरसावले आहेत, असे त्यांनी सूचित केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकतर्फी आक्रमकपणा करण्याच्या भाजपच्या सवयीला आळा बसणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे भाजप बरोबरचे परतीचे दोर कापले गेले असल्याचे स्पष्ट झाल्याने मूळचा आक्रमक शिवसैनिक आता अधिकच आक्रमक होताना दिसणार आहे.
राष्ट्रवादीकडे जे ताकदीचे नेते आहेत तेही यापुढील काळात भाजपशी दोन हात करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता बळावली आहे. थोडक्यात सांगायचे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भाजप संबंधातील आक्रमकपणामुळे राज्यातील सरकारविषयीची संभ्रमावस्थाही संपली आहे.