लेखक, संपादक, गीत संग्राहक, कवी व गीतकार, नाटककार, बालसाहित्यिक, चरित्रकार गंगाधर महांबरे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1931 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठात वर्ष 1956 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी मिळविली.
सुरुवातीस मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते ग्रंथपाल म्हणून रूजू झाले. नोकरीतील पहिल्या दिवशी त्यांची एका महान व्यक्तीशी भेट झाली, त्यांच्या आयुष्यातील ती एक मर्मबंधातील ठेव होती. त्याचे असे झाले, ग्रंथालयातील पहिल्याच दिवशी सर्व काम समजून घेण्यात संध्याकाळ झाली. नेमके त्याच वेळेला लाइट गेली. कंदिलाच्या प्रकाशात त्यांचे काम चालू होते. त्याच वेळी एक सुटाबुटातील व्यक्ती त्यांच्यापुढे उभे राहिली व “मला एक पुस्तक हवे आहे’ असे म्हणाली.
सर्वजण पुस्तकाची यादी पाहू लागले. त्यावर त्या व्यक्तीने “तुम्ही काही शोधू नका. मला माहीत आहे ते पुस्तक कुठे आहे’ असे म्हणून ते पुस्तक कपाटातून स्वतःच आणले. तेवढ्यात लाइट आली व त्या लख्ख प्रकाशात त्यांना साक्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन झाले. पुढे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या ग्रंथालयात आणि पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी ग्रंथपाल म्हणून काम पाहिले.
महांबरे यांच्या लेखनाची सुरुवात 1948 पासून झाली होती. “दिलजमाई’, “रंगपंचमी’, “सिंधुदुर्ग’, “कोल्हा आणि द्राक्षे’ या नाटिका आणि “देवदूत’, “संतांची कृपा’, “नजराणा’ ही नाटके तसेच “गौतम बुद्ध’, “जादूचा वेल’, “जादूची नगरी’, “बेनहर’ ही बालगोपाळांसाठी तसेच “चार्ली चॅपलिन’, “वॉल्ट डिस्नी’ यांची चरित्रे लिहिली. आदिवासींसाठी “लघुउद्योग’, “अपंगांसाठी लघुउद्योग’, “महिलांसाठी उद्योग व्यवसाय’, “इलेक्ट्रॉनिक्स उद्योग व्यवसाय’ अशी पुस्तकेही लिहिली. ते संग्राहकही होते. रंगभूमीवरील गाण्यांचा संग्रह, महाराष्ट्र गौरवगीते, पी. सावळाराम, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या गीतांचे संग्रह त्यांनी संपादित केले.
तसेच त्यांचे “आपली आवड’, “उषःकाल’, “रसिका तुझ्याचसाठी’, “मराठी गजल’, “आनंदाचे डोही’ इत्यादी गीत संग्रह प्रकाशित आहेत. ग. का. रायकर आणि महांबरे या दोघांनी मिळून मराठी संगीत नाटकांतील 205 पदांचे संकलन-संपादन केले. “द्वंद्वगीत’ या शब्दाऐवजी “युगुलगीत’ हा शब्द रूढ केला. माडगूळकरांच्या गीत रामायणाप्रमाणे त्यांनी “गीत गौतम’ लिहिले. त्यांचे लेखन अत्यंत सोपे, साधे, प्रासादिक आहे तसेच त्यांच्या गीतांमध्ये शब्दसुमनांची गुंफण आकर्षक आहे.
“मौलिक मराठी चित्रगीते’ या त्यांच्या पुस्तकाला वर्ष 2001 मधे राष्ट्रपतींनी सुवर्णकमल देऊन त्यांचा सन्मान केला. “ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा’ या पुस्तकाला वर्ष 2008 मधे महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे मराठीतील सर्वस्पर्शी योगदान पाहून कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर म्हणाले, “जय’नाद निनादती अंबरे, जय जय गंगाधर महांबरे.’ त्यांचे 23 डिसेंबर 2008 रोजी निधन झाले.