– हिमांशू
खरं म्हणजे संपूर्ण जगात सध्या कुणीच आनंदी असणार नाही, असं आपल्याला वाटेल. गेल्या वर्षभरात करोना विषाणूची टांगती तलवार डोक्यावर सतत असताना आणि नात्यागोत्याची, ओळखीपाळखीची माणसं मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या ऐकायला मिळत असताना कुणी कसं सुखी राहू शकेल? खरं तर संयुक्त राष्ट्रांनी किमान यंदा तरी जगातल्या आनंदी देशांची यादी जाहीर करायला नको होती. एकतर अशा याद्यांमध्ये आपला नंबर खूपच खाली असतो.
आधीच इतकी दुःखं असताना पुन्हा ही मंडळी जखमेवर मीठ चोळतात. शिवाय अशा याद्यांच्या ज्या बातम्या वाचायला मिळतात, त्यात तुलना केली जाते. आता बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यापेक्षाही आपला नंबर खाली आहे, असं वाचलं की दुःख वाढणारच ना? या देशातली मंडळी कशी काय इतकी आनंदी असतात, कुणास ठाऊक? पण दरवर्षी “आमच्यापेक्षा ते सुखी’ हे आम्हाला नित्यनेमानं ऐकवलं जातं.
हा एक आंतरराष्ट्रीय कटच म्हणायला हवा. आपल्या आजूबाजूचे छोट्या आणि गरीब मानल्या गेलेल्या देशांमधली माणसं आपल्यापेक्षा अधिक सुखी आहेत हे ऐकून जे दुःख होतं ना… त्यातून सावरण्यापूर्वीच पुढच्या वर्षीसाठी सर्वेक्षण केलं जात असावं, अशी आम्हाला दाट शंका आहे. “हॅपीनेस स्कोअर’ म्हणे! तो मोजणार कसा? मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्यच आहे कशावरून? शंकाच घ्यायच्या म्हटल्यावर कितीतरी घेता येतील.
सांगणारे सांगतात की, संबंधित देशाचा जीडीपी किती? सामाजिक सुरक्षिततेची परिस्थिती काय आहे? व्यक्तिगत स्वातंत्र्य किती आहे? भ्रष्टाचार किती आहे? अशा मुद्द्यांवर आधारित प्रश्न त्या-त्या देशातल्या नागरिकांना विचारले जातात. कधी विचारले? कुणी विचारले? हे प्रश्न विचारणारे आम्हालाच बरे कधी भेटत नाहीत! की आमचा मूळचा आनंदी चेहरा बघून कडेकडेने निघून जातात आणि फक्त दुर्मुखलेल्या चेहऱ्याच्या मंडळींनाच पकडून प्रश्न विचारतात ही मंडळी? कोणत्याही समाजात काहीजण सुखी, काहीजण दुःखी असतातच. काल दुःखी असणारा माणूस आज सुखी असू शकतो. मग प्रश्न विचारायला येणाऱ्यांची वेळ चुकते म्हणावं का?
दरवेळी या लहान-लहान शेजारी देशांमधले लोक अधिक आनंदी आहेत, हे ऐकून-ऐकून वैताग आलाय. फिनलॅंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलॅंड, नेदरलॅंड हे पहिल्या पाचात नंबर मारणारे देश! हवामान आल्हाददायक आहे या देशांमधलं. लोकांचे चेहरे प्रफुल्लित दिसणारच! पण आम्हाला प्रश्न असा पडतो की, आमच्या शेजारी देशांमध्ये जवळपास आमच्या देशासारखंच हवामान आणि परिस्थिती असून ही मंडळी जास्त आनंदी कशी? या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तेव्हा आम्ही उलट्या दिशेनं अभ्यास सुरू केला. आपल्याकडे लोक दुःखी का? हे शोधू लागलो.
आमच्या अभ्यासानुसार नुकतंच सापडलेलं कारण असं, की आपण भारतीय मंडळी राजकारण, राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांना फारच गांभीर्याने घेतो. आपल्याकडे बहुतांश मंडळी दिवसभर सोशल मीडियावर असतात आणि राजकारणाचा विषय चघळत राहतात. “आपला माणूस’ चूक असूच शकत नाही आणि “समोरचा’ बरोबर असूच शकत नाही, हे सिद्ध करण्यासाठी तहानभूक विसरून जिवाच्या आकांतानं भांडत राहतात. अखेर, सगळेच चुकतात… (आपणसुद्धा) हे वास्तव समजल्यावर माणसं दुःखी नाहीतर काय आनंदी होतील?