राजकारण हे सर्वव्यापी असून, समाजकारण, अर्थकारण ते संस्कृतीकरणापर्यंत सगळ्याशी त्याचा संबंध असतो. 1940च्या दशकाच्या पूर्वार्धात दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर नाझीविरोधी आघाडीला समर्थन प्राप्त व्हावे, यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात युद्धाधारित वृत्तपटांच्या वितरणासाठी व माहितीपटांच्या निर्मितीसाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने त्यांनी भारतातील वाडिया मूव्हीटोनच्या जे. बी. एच. वाडिया यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म ऍडव्हायझरी बोर्ड (एफएबी) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत दीडशेच्या वर लघुपट निर्माण करून, ब्रिटिशांची युद्धवादी भूमिका लोकांसमोर मांडण्यात आली.
स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजन या संस्थेची स्थापना केली. नेहरूयुगात लोकशिक्षण हाच हेतू ध्यानात घेऊन, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट फिल्म्स डिव्हिजनने तयार केले. सुखदेव, श्याम बेनेगल, सत्यजित राय, मणी कौल यांसारख्या दिग्दर्शकांनाही खास लघुपट निर्माण करण्यासाठी पाचारण करण्यात आले. सत्यजित राय यांनी 1947 साली ख्यातनाम समीक्षक चिदानंद दासगुप्त यांच्या सहकार्याने कोलकाता फिल्म सोसायटीची स्थापना करून भारतात फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे नववास्तववादी, अभिव्यक्तिवादी, अस्तित्ववादी आदी अनेक चित्रपट प्रवाहांचा परिचय शक्य झाला. प्रेक्षकांच्या रुची व दृष्टिकोनात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न फिल्म सोसायट्यांनी सातत्याने सुरू ठेवले.
1960 साली केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिपत्याखाली पुण्यामध्ये “फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. तेथे ऋत्विक घटक, हृषिकेश मुखर्जी ते सईद मिर्झांपर्यंत अनेकांनी अध्यापन व मार्गदर्शनात आपले योगदान दिले. या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक प्रतिभावंतांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला आगळा ठसा उमटवला. हे सर्व कथन करण्याचे कारण म्हणजे, लालसिंग चढ्ढा या चित्रपटावरून आमिर खानवर सध्या होणारी टीका. ही टीका इतकी अज्ञानमूलक आहे, की त्यामुळे इतक्या संस्था निर्माण करूनदेखील आपल्या सांस्कृतिक जाणिवा प्रगल्भ झालेल्या नाहीत, असाच निष्कर्ष निघतो. हा चित्रपट “फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. विन्स्टन ग्रुमच्या 1986 मध्ये आलेल्या कादंबरीवरील “फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाने सहा ऑस्कर्स प्राप्त केली होती. त्यात अभिनेता टॉम हॅंक्स याने प्रमुख भूमिका साकारली होती.
“लालसिंग चढ्ढा’ मध्ये आमिर खान आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा आमिर खान टॉम हॅंक्सची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका करण्यात येऊ लागली. वास्तविक केवळ ट्रेलर बघून कोणत्याही चित्रपटाबद्दल घाईघाईत शेरेबाजी करणे चुकीचे आहे. तर काही सोशल मीडिया युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली. त्याचे कारण काय, तर आमिर हा म्हणे भारतीय संस्कृती व सभ्यतेबद्दल बरेच काही बोलला आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत, असे आवाहन काहीजणांनी ट्विट करून केले. वास्तविक आमिर हा उत्कृष्ट विचारी अभिनेता असून, भारतीय संस्कृती वगैरेंबद्दल त्याने कधीही चुकीची वक्तव्ये केलेली नाहीत. उलट आपल्याकडे अनेकजण रस्त्यांवर थुंकतात, कचरा फेकतात. यामुळे परदेशी पर्यटकांसमोर देशाचे नाव खराब होते, अशा आशयाच्या प्रचारपटातच त्याने काम केले होते. त्याचप्रमाणे सत्यमेव जयते सारख्या टीव्ही कार्यक्रमातून आमिरने अंधश्रद्धा, स्त्रियांवरील अन्याय अशा अनेक समस्यांवर हल्ला चढवून सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला होता.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला त्याने हात घातला आणि ग्रामीण भागाला दिलासा मिळेल असे उपक्रम तो आजही राबवत आहे. काही वर्षांपूर्वी देशातील घटना बघून, देश सोडून जावे का, असे किरण राव हिने बोलून दाखवल्याचे आमिरने म्हटले होते. देशातील वाढती असहिष्णुता, अन्य धर्मीयांचा द्वेष, गोहत्या केल्याचा संशय आल्यामुळे होणाऱ्या हत्या या सगळ्याचा संदर्भ त्याला असावा. प्रसिद्ध लेखक दिवंगत यू. आर. अनंतमूर्ती यांनीही अशी भावना व्यक्त केली होती. गिरीश कर्नाड व विजय तेंडुलकर किंवा नसिरुद्दीन शहा यांच्या भावनाही तीव्र झाल्या होत्या. आमिरने कोणतेही टोकाचे वक्तव्य केले नव्हते. एखादा कलाकार जेव्हा विशिष्ट भावना व्यक्त करतो, तेव्हा त्याची केवळ भाषा लक्षात न घेता, त्यामागील मूळ हेतू काय आहे, ते बघितले पाहिजे असे वाटते.
भारतातील असहिष्णुता दोन्ही बाजूची आहे, केवळ एका बाजूची नव्हे, हे वारंवार दिसून आले आहे. नूपुर शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह होते, परंतु त्याचवेळी त्या निमित्ताने झालेल्या हत्या, याही अत्यंत निषेधार्ह म्हणाव्या लागतील. आमिरने तर, माझे हा देश आणि देशातील लोकांवर अत्यंत प्रेम आहे आणि तरी माझ्या वक्तव्यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल, तर मी माफी मागतो, असे म्हटले आहे. मला कोणालाही दुखवायचे नाही आणि ज्यांना हा चित्रपट बघायचा नाही, त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, असे उद्गार आमिरने काढले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आमिर नर्व्हस होता आणि दोन दिवस त्याला झोप आली नाही. मुळात हा केवळ एकट्या आमिरचा चित्रपट नसून, इतर अनेक कलावंत व तंत्रज्ञांनी बनवलेला चित्रपट आहे. शिवाय चित्रपटबाह्य कृती व वक्तव्याबद्दल चित्रपटावर बहिष्कार टाकणे, हे साफ चुकीचे आहे.
लालसिंग चढ्ढावर बहिष्कार टाकत, हॅशटॅग ट्रेंड होत होते, त्याचप्रमाणे बॉयकॉट रक्षाबंधन हाही हॅशटॅग ट्रेंडिंग होता. अक्षयकुमारच्या “रक्षाबंधन’ या चित्रपटाची लेखिका कणिका ढिल्लॉं हिने पूर्वी गोमुत्राबाबत एक ट्विट केले होते. अशा प्रकारे कोणत्याही चित्रपटावर बहिष्कार घालणे गैर असल्याचे अक्षयकुमारनेही म्हटले आहे. एखाद्या कलाकार, लेखक वा विचारवंतांची मते मान्य नसली, तर त्यांचा अवश्य प्रतिवाद करावा. अतिरेकी वा वादग्रस्त विधाने केल्यास, शांततापूर्ण आंदोलनेही जरूर करावीत; परंतु त्यामुळे कलाकृतीवर बहिष्कार टाकणे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. कोणी “लालसिंग चढ्ढा’चे कौतुक केले, म्हणून त्यालाच टीकेचे लक्ष्य बनवणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. आपण कुठल्या दिशेला जात आहोत, याचा विचार समाजानेच केला पाहिजे आणि सुधारणा स्वतःत घडवून आणली पाहिजे.