“क्रांतिसिंह’ म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार दिगंबर विनायक पुरोहित ऊर्फ नाना पुरोहित यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 28 मे 1907 रोजी महाड वरंधा रोडवरील काळ नदीच्या काठावरील बिरवाडी या गावात झाला. नानासाहेबांनी आपले आयुष्य सामाजिक बाबींसाठी व्यतीत केले. महाड परिसरात शेतकरी आंदोलन व स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती.
नानासाहेबांनी रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पहिल्या रायगड मिलिटरी स्कूलची स्थापना 12 ऑगस्ट 190 रोजी रायगड जिल्ह्यातील महाडजवळील अचलोली गावात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ही शाळा आहे. रायगडाच्या पायथ्याजवळील हे मिलिटरी स्कूल दुर्लक्षित झाले असून जवळ जवळ बंद अवस्थेत आहे.
वर्ष 1938 मधे कॉंग्रेस समाजवाद्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले होते. “सावकारशाही ठेवायची नाही’ या घोषणेने भारावून महाड तालुक्यात शेतकरी आपल्या बायका-पोरांसह नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली संघटित होत होते. नानासाहेब कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टी आणि भारत छोडो आंदोलनात अग्रेसर होते. त्यांनी महाडमध्ये बंडाचे नेतृत्व केले. त्यांनी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसोबत हल्ला केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एका सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू आणि पाच लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर नानासाहेब पुरोहित पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. भोर मार्गे ते पुण्यात आले व अच्युत पटवर्धन यांची गाठ घेतली. त्यांच्यावर “शूट ऍट साइट’ असा आदेश होता. हे लक्षात येताच अच्युतरावांनी त्यांना कराचीला पाठविले. तेथे जाऊन ते बेकरी व्यवसाय शिकले. परत आल्यावर त्यांनी महाडमध्ये बेकरी व्यवसाय सुरू केला.
वर्ष 1948 मध्ये पुरोहित यांनी मोहन धारिया यांच्यासोबत जवळचे जंजिरा राज्य मुक्त करण्यासाठी लोकसेनेची स्थापना केली. बंडखोरांनी म्हसळे तालुक्याच्या सीमेवरील खामगाव येथे लष्करी छावणी स्थापन केली आणि तेथे स्वतंत्र जंजिरा राज्यासाठी हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये पुरोहित (पंतप्रधान), सदाशिव बागाईतदार (गृहमंत्री), मोहन धारिया (परराष्ट्र मंत्री) आणि जनार्दन भोकरे (संरक्षण मंत्री) असे मंत्रिमंडळही निर्माण केले होते.
स्वातंत्र्यानंतर ते प्रजासमाजवादी पार्टीकडून राजकारणात उतरले. वर्ष 1957 च्या निवडणुकीत त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून महाडची जागा जिंकली. पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्र विधानसभेत प्रसोपाचे उपनेते होते. 1962 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार अब्दुल रहीम ए. गफूर अंतुले यांच्याकडून श्रीवर्धन मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. 10 वर्षांनंतर नानासाहेब वर्ष 1972 मध्ये महाडमधून महाराष्ट्र विधानसभेत परतले, पुन्हा महाडमधून वर्ष 1978 मध्ये सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले. महाड येथे 27 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.