ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर आहेतच, त्याची दखलही तितक्याच गांभीर्याने घेतली गेली पाहिजे. देशाला विविध स्पर्धेत पदके व विजेतेपद मिळवून देणारे कुस्तीपटूच जर असे आरोप करत असतील, तर त्याचे फलित काय, असा प्रश्न निर्माण होतो. यातून सत्य बाहेर यावे आणि हा केवळ आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा होऊ नये.
देशाची प्रख्यात महिला कुस्तीपटू विनेश फोगटने केलेले आरोप खरोखरच गंभीर आहेत. सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले, त्यांच्याशी असभ्य वर्तनही केले, असे विनेशने म्हटले आहे. केवळ सिंगच नव्हे तर काही प्रशिक्षकही यात गुंतले असल्याचा आरोपही तिने केला आहे. याचीच दखल घेत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने सिंह यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. एक गोष्ट घडते तेव्हा ती अचानक समोर येत नाही, त्यामागे काहीतरी कारण निश्चितच असते. आता याचाच शोध घेतला गेला पाहिजे. नुसतेच आरोप करून भागणार नाही, तर त्याचे पुरावेही द्यावे लागतील. एकीकडे कुस्तीपटू आरोप करत आहे तर दुसरीकडे सिंह हे आरोप फेटाळत आहेत. हा सामना दीर्घकाळ चालणारा ठरेल. कारण यातून बाहेर काहीच येणार नाही. मात्र, त्याचा लाभ राजकीय स्तरावर घेतला जाऊ शकेल.
मुळातच भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेले सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या तीन टर्म पूर्ण केल्या असून त्यांना पायउतार व्हावेच लागणार आहे. महासंघाची निवडणूकही दृष्टिपथात आहे. त्यामुळे हे आंदोलन खरेच कुस्तीपटूंनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुरू केले आहे का, कोणाच्या वरदहस्ताने हे सुरू झाले आहे याचाही शोध घेतला गेला पाहिजे. बबिता फोगट ही देशाची प्रख्यात कुस्तीपटू असून तिनेही या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. कारण, तीदेखील भारतीय जनता पक्षाचीच नेत्या आहे. पहिल्यांदा खेळाडू असून नंतर राजकीय व्यक्ती असल्याचा खुलासाही तिने केला असून सरकार स्तरावर याबाबत आवश्यक त्या बाबी करण्याची तयारीही तिने बोलून दाखवली आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट, सरीता मोर, अंशु मलिक, रवी दहिया, दीपक पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. मुळात प्रश्न हा आहे की, सिंह यांच्यासह प्रशिक्षकांवर केलेल्या आरोपांबाबत या कुस्तीपटूंनी यापूर्वी कधी तक्रार केली होती का, तसेच लेखी निवेदन देत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता का, हे देखील पाहिले गेले पाहिजे.
काही काळापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी विनेशने असेच काही आरोप केले होते मात्र, त्याचे पुढे काय झाले ते देखील या निमित्ताने समोर आले पाहिजे. त्यावेळी विनेशने आत्महत्येचाही विचार बोलून दाखवला होता. मात्र, तेव्हा ती एकाकी पडली होती. आताचे चित्र वेगळे आहे. आंदोलनात बसलेले जवळपास सगळेच खेळाडू देशासाठी मोठे मानसन्मान मिळवून देणारे आहेत व ही एकजूट केवळ सिंह यांच्याच नव्हे तर संपूर्ण पोखरल्या गेलेल्या महासंघाविरोधात असल्याचे सध्यातरी दिसत आहे. क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी या आंदोलनातील कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रित केले होते त्यात काय घडले व सरकारने तसेच केंद्रीय क्रीडामंत्रालयाने याबाबत खेळाडूंशी काय चर्चा केली हे देखील समजले पाहिजे. केवळ आरोप केले म्हणजे झाले असे नसते, त्यातून काय निष्पन्न होते हे महत्त्वाचे आहे. सीपीआयएमच्या नेत्या वृंदा कारत यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता मात्र, या कुस्तीपटूंनीच त्यांना येथून बाहेर जाण्याची विनंती केली व या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा हेतू नसल्याचेही सिद्ध केले. तसेच कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विटरवरून या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. मात्र, आता या आरोप व प्रत्यारोपांचा राजकीय आखाडा झाला नाही म्हणजे मिळवले.
सध्यातरी हे आंदोलन महासंघाचे अध्यक्ष सिंह, काही प्रशिक्षक व एकूणच व्यवस्थेविरुद्ध कुस्तीपटू असेच राहिले पाहिजे. महासंघाची निवडणूक लवकरात लवकर घेतली जावी व नवी कार्यकारिणी आली पाहिजे, अशी प्रमुख मागणी या कुस्तीपटूंनी केली असून त्यांची व सरकार स्तरावरील बैठक होऊन काय निर्णय घेतला जातो ते महत्त्वाचे आहे. येत्या काळात मोठ्या स्पर्धा आहेत, तसेच 2024 साली ऑलिम्पिक होणार आहे. जे खेळाडू देशाची शान आहेत व त्यांनी विविध स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून दिली आहेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय थांबायलाच हवा. सिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत व या आंदोलनामागे महासंघाच्या निवडणुकीत स्वारस्य दाखवत असलेल्या एका बड्या शक्तीचा हात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गेली दहा वर्षे या खेळाडूंनी आवाज का उठवला नाही तसेच हे आरोप आता अचानक कसे सुरू झाले याचीही चौकशी व्हावी. त्यातच सिंह यांनी आपणही वाचाळ असल्याचे दाखवून दिले आहे. वय वाढत असल्याने पदके जिंकू शकत नसल्याने निराश झालेले खेळाडू आता हे असले आरोप करत असल्याचे मत सिंह यांनी माध्यमांकडे व्यक्त केले आहे. खरेतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अत्यंत पारदर्शीपणे झाली पाहिजे तरच त्यातून तथ्य व सत्य बाहेर येईल मगच समजेल की कुस्तीपटूंवर खरोखरच अन्याय झाला आहे की सिंह यांच्यासह काही प्रशिक्षकांना व पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा हा केवळ एक राजकीय स्टंट आहे. आता चौकशी समिती नेमली जाईल किंवा सध्याच्या महासंघाची कार्यकारिणी बरखास्तही केली जाईल.
सिंह यांच्यासह आरोप करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना हटवले जाईल आणि निवडणूक घेत नवी कार्यकारिणी नियुक्ती केली जाईल. पण हे आंदोलन ज्या हेतूसाठी सुरू झाले ते पूर्ण होऊन खेळाडूंवर होत असलेला अन्याय दूर होणार का व दोषींवर कठोर कारवाई होणार का, या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आहे.