माणसाने कधीही नाराज राहू नये. सर्वच गोष्टी मनासारख्या घडतील असं नाही. मानसशास्त्र सांगतं, की आपण सळसळत्या ऊर्जेनं काहीतरी करू पाहतो आणि त्या ऊर्जेला कुणीतरी अटकाव करतं तेव्हा मन नाराज होतं. ऊर्जेला आलेलं हे वैफल्य रागाचं स्वरूप धारण करतं आणि रागाच्या भरात जे काही घडतं, त्यावर आपलं नियंत्रण राहत नाही.
वस्तुतः राग ही मुख्य भावना नाही, तर ते “उपउत्पादन’ आहे. परंतु ते मुख्य उत्पादनापेक्षा अधिक नुकसानदायक ठरू शकतं. सोशल मीडियाच्या आजच्या युगात तर हे वळण आत्यंतिक धोक्याचं. कारण नाराजीचं रागात रूपांतर होता-होता सोशल मीडियावर काहीतरी ट्विट केलं जातं आणि काही तासांतच त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. काय करणार? सोशल मीडियानं भावना लपवायला जागा ठेवलेली नाही आणि उरल्यासुरल्या बाबी मीडिया वदवून घेतो.
तुम्ही नाराज आहात का, असं मीडियानं विचारलं की नकारार्थी उत्तर द्यावं लागतं आणि सोशल मीडिया होकारार्थी उत्तर देत असतो. मग “चुकून ट्विट झालं,’ असं सांगावं लागतं. मग दुसरा प्रश्न असा येतो की, ट्विट चुकून झालं असलं तरी डीपीवरचा फोटो कसा बदलला? तर तेही “चुकून’च झालं असं सांगावं लागतं. शंभरातल्या किती लोकांना हे उत्तर पटत असेल, हा प्रश्न अशा वेळी मीडियानं नव्हे, स्वतःच स्वतःला विचारायचा असतो.
मीडिया मात्र ट्विटनंतर कुणाकुणाचे फोन आले? कुणी समजूत काढली? एकाच जिल्ह्यातल्या किती जणांना मंत्रिपदं देणार? समजा, यापुढेही नंबर लागला नाही तर? तुम्ही दबावतंत्र वापरताय का? असे प्रश्न विचारून भंडावून सोडतो. मग हळूहळू उत्तरं बाहेर पडू लागतात. अखेर विमान येऊन उतरतं कार्यकर्त्यांच्या धावपट्टीवर! कारण आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावं, असं सगळ्यांच्याच कार्यकर्त्यांना वाटत असतं. बरं, कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे नेमके कुठले कार्यकर्ते नाराज आहेत, असं काही मीडिया विचारत नाही आणि संवाद संपतो; परंतु कुणीतरी “नाराज’ आहे, या वास्तवावरच! कार्यकर्ता हे अमोघ अस्त्र आहे. त्यांना भर कार्यक्रमात विचारावं, “”तुम्ही माझ्यासोबत आहे का?” कार्यकर्ता कधीच “नाही’ म्हणणार नाही.
मग आपण डावीकडे-उजवीकडे, कुठेही गेलो तरी कार्यकर्ता आपल्यासोबत येईल, याची खातरजमाही तिथेच जाहीरपणे करून घेता येते आणि वर “हे दबावतंत्र नाही,’ असंही निक्षून सांगता येतं. आपल्याला संधी मिळाली नाही, तर आपल्याला काहीच वाटणार नाही; पण कार्यकर्त्यांचं काही सांगता येत नाही, हा नाराजीचं रूपांतर रागात करण्याचा त्यातल्या त्यात मवाळ मार्ग. नाराजी दिसणारही नाही आणि दिसल्याशिवाय राहणारही नाही, याची काळजी घेणारा हा अत्यंत हुशारीचा मार्ग!
काहीजण कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी नाराज होतात. आपल्याला संधी मिळाली नाही, तर या वर्गाला वालीच राहणार नाही, याची त्यांना खात्री असते. “आम्ही सगळ्यात आधी पोहोचलो,’ हे सांगायलासुद्धा ते विसरत नाहीत आणि त्याचं फळ आपल्याला नव्हे तर गरीब जनतेला मिळालं पाहिजे, असा मुलामाही देऊन टाकतात. थोडक्यात, मानसशास्त्रानुसार नाराजीचं रूपांतर रागात होतंच; फक्त अभिव्यक्ती वेगवेगळी असते. अशा लक्षवेधी “अभि’नेत्यांनीच नाराजी”नाट्य’ शब्द सुपरहिट केलाय!