-अरुण गोखले
एकदा एक महिला आपल्या नवविवाहित मुलाला आणि सूनेला घेऊन महाराजांच्या दर्शनास आली. त्या दोघांना पुढे करीत ती म्हणाली, “”महाराज! ही माझी लेक सून, ह्यांना तुमचा आशीर्वाद द्या.”
तेव्हा नमस्कारासाठी चरणी झुकलेल्या त्या दाम्पत्यास शुभाशीर्वाद देत महाराज म्हणाले, “”हे पाहा, आता तुमचा नव्याने संसार सुरू झाला आहे. तेव्हा काही चार गोष्टी नीट लक्षात घ्या.”
त्या नवदाम्पत्याने मान डोलावली.
महाराज नववधूला म्हणाले, “”हे पाहा, प्रपंच मांडायला प्रत्येकालाच एक घर असावं लागत. बाळ, कालपर्यंत तू तुझ्या माहेराला तुझं घर मानत होतीस. आता हे सासरचं नवं घर हे तुझं झालेलं आहे. तेव्हा या घराची परंपरा, प्रतिष्ठा आणि घरपण टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न कर.”
नंतर महाराज नवऱ्या मुलाला म्हणाले, “”आणि बरं का माधवा! आता तू पण हे लक्षात घे की कालपर्यंत तू एकटा होतास. आता तुझ्यासोबत तुझी पत्नी ह्या घरात आलेली आहे. घर हे सर्वांचेच असते. प्रत्येकानेच ते आपलं म्हणून जपायला, सांभाळायला आणि सजवायला हवे.”
पुढे महाराज म्हणाले, “”घराला घरपण येतं ते त्या घरातल्या माणसांमुळे आणि त्यांच्यातील परस्परांत असलेल्या स्नेहसंबंधांमुळे. घरातल्या प्रमुख व्यक्ती म्हणजे “तो’ आणि “ती’. घर हे उभं राहात असते ते पती आणि पत्नी ह्यांच्यातील असणाऱ्या भरभक्क्म विश्वासाच्या पायावर. घर म्हणजे काही केवळ चार भिंती नसतात. केवळ दगडामातीतून उभी राहते ती इमारत, घर नाही.
घर उभ राहात जाते ते त्या घरातील प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नातून आणि कष्टातून. घर छोटं आहे की मोठे, ह्याचा विचार करायचा नसतो तर विचार करायचा असतो, तो त्या घरात आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने किती माणसं राहतात ह्यावर.
आदर्श घर हे तेच की ज्या घराच्या भिंती या विश्वासावर उभ्या आहेत. ज्या घराला प्रेमाचं छप्पर आहे. ज्या घरात देवघर आहे, ज्या घराला मर्यादेचा उंबरठा आहे, जिथं शांतीचं अंगण आणि ईश्वर निष्ठेची तुळस आहे.”
महाराजांनी आशीर्वादाचे चार बोल सांगितल्यानंतर ते नवदाम्पत्याला म्हणाले, “”काय बाळांनो, मी काय म्हणतो आले ना ध्यानात? आता राहील ना दोघांच्याही लक्षात की, घर हे कोणाचं असतं ते?” दोघांनीही होकारार्थी मान हलविली. पुन्हा एकदा महाराजांना नमस्कार करून ती दोघे उठली. महाराजांच्या उपदेशाने त्या महिलेस आणि नवदाम्पत्यास एक वेगळाच आनंद सुखावून गेला.