दोन गावांच्यामधून एक नदी वाहत होती. नदीच्या या काठावर एक लहान गाव होतं तर दुसऱ्या काठावर मोठं. सखाराम हा नदी काठावरील छोट्या खेड्यात राहात होता. तिथं त्याचं छोटसं घर होत.
शेत होतं. गोठ्यात दहा-बारा गाई-म्हशी होत्या. त्यांचे दूध तो नदीपलीकडच्या मोठ्या गावात नेऊन विकायचा. त्या मोठ्या गावात त्याची काही बांधलेली गिऱ्हाईकेही होती. एकूणच काय! तर सखारामाचं ठीक चाललं होतं. पण जे आणि जेवढं मिळेल त्यात तो सुखी आणि समाधानी नव्हता. त्याला नेहमी असं वाटायचं की आपल्याला भरपूर पैसे मिळाले पाहिजेत. आपल्याकडे चैनीची साधने असली पाहिजेत. आपण सुखात आणि एषोआरामात रहावे.
सकाळी सकाळीच दूधाच्या किटल्या भरायचा आणि नावेतून या तिरावरून त्या तिरावर यायचा. पण त्याला एक फार वाईट सवय होती. अर्थात ती सवय त्याला त्याच्या स्वार्थी आणि लोभीपणामुळेच लागली होती. तो काय करायचा? दुधाचे जास्त पैसे मिळावेत म्हणून नदीतून जाताना नाव मध्यावर गेली की कोणी पहात नाही ना, याची खात्री करून दुधात नदीचं पाणी मिसळायचा, ते दूध विकून पाण्याचा पैसा करायचा. त्याचा हा कारभार अनेक दिवस चालू होता.
एकदा त्याने जमा केलेल्या पैशातून दागिने, नवे कपडे, काही छान छान वस्तू खरेदी केल्या. बरीच खरेदी करून नावेतून तो आपल्या गावाकडे जायला निघाला. तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्याची नाव डगमगू लागली. एका क्षणी तर एका मोठ्या लाटेबरोबर नाव इतकी तिरकी झाली की सखाराम सावरेपर्यंत त्याच्या चिज वस्तूंचे गाठोडे नदीत पडले. त्याने बराच प्रयत्न केला, धडपड केली. पण त्याच्या हाताला स्वत:चा जीव वाचविण्याशिवाय काही लागले नाही. आता मात्र तो कपाळावर हात मारून घेत आणि छाती बडवून घेत रडायला लागला.
आपलं धन गेलं, पैसा गेला म्हणून तो नदीच्या काठावर शोक करू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, “”अरे सखाराम! काय झालं तू असा रडतोस का?” त्याने आवाजाच्या रोखाने पाहिले आणि त्याला मोठे आश्चर्य वाटले. कारण ती नदीच त्याच्याशी बोलत होती. नदी त्याला म्हणत होती, “”सखाराम, अरे तू आता कशासाठी रडतो आहेस. कालपर्यंत खोटेपणाने वागताना, दुधात पाणी मिसळून लोकांना फसवत होता. तू आजवर अनीतीने, खोटेपणाने, लबाडीने लोकांना फसवून त्यांच्याशी खोटेपणाने वागून जे धन कमवलेस, तो पाण्याचा पैसा पाण्यात वाहून गेला.”