– कल्याणी शंकर
शशिकला यांनी अचानक राजकीय संन्यास जाहीर करून खळबळ उडवून दिली होती आणि आता त्या परत येण्याच्या तयारीत आहेत…
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटच्या सहकारी व्ही. के. शशिकला या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. चिन्नम्मा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शशिकला यांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. जयललिता यांची सावली म्हणून वावरणाऱ्या शशिकला यांनी सत्तेची फळे देखील चाखले आहेत. परंतु आपण केवळ सावली आहोत, जयललिता नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही.
जयललिता यांच्यानंतर त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतले आणि 2017 मध्ये जयललिता यांच्या वारसदार बनल्या. परंतु भाजपने त्यांच्या योजनांवर पाणी फेरले आणि त्यांना चार वर्षे कर्नाटकच्या तुरुंगात राहावे लागले. 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी सकाळी शशिकला या जयललिता यांच्या स्मारकाजवळ थांबल्या. कारण त्या बंगळुरूच्या तुरुंगात जाण्याच्या मार्गावर होत्या. त्यांनी जयललिता यांच्या स्मारकाला तीनदा हात लावला आणि शत्रूचा बदला निश्चित घेऊ, अशी शपथ घेतली. यादरम्यान बराच काळ निघून गेला. आता सुटकेनंतर आणि विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने सत्ता गमावल्यानंतर त्या पुन्हा नव्याने राजकारणात एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. शशिकला यांनी राजकारणात परत येण्यासाठी योजना आखल्याचे पक्षातील सूत्र सांगतात.
आपल्या भविष्यावरून शशिकला या काही संशयास्पद संकेत सर्वत्र पसरवत आहेत. 2021 चे महत्त्व पाहता 2017 या वर्षाला काहीच अर्थ राहत नाही. या चार वर्षांत बरेच बदल झाले आहेत. त्यांनी निवडलेले नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम तसेच इ. पलानीस्वामी यांनी पक्ष ताब्यात घेतला आणि त्या दोघांनाही आता शशिकला नकोत. तत्पूर्वी शशिकला या दोन्ही नेत्यांसमवेत सत्तेच्या वेगवेगळ्या ताणाताणीत अडकून राहिल्या. ई.पी.एस आणि ओ.पी.एस या दोघांत भांडणे वाढली आहेत. अशात शशीकला यांचे कमबॅक उत्साह निर्माण करणारा आहे. अर्थात त्या 2027 पर्यंत निवडणुका लढवू शकत नाहीत. परंतु पक्ष प्रमुखासाठी कोणताही कायदा त्यांना रोखू शकत नाही.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताना शशिकला यांनी अचानक राजकीय संन्यास जाहीर करून खळबळ उडवून दिली आणि आता त्या परत येण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही घटनामागची कारणे अद्याप गुपित आहे. त्यांना राजकारणात कशामुळे यायचे आहे, याचे कोडे उलगडत नाही. एका अर्थाने शशिकला यांना एंट्री करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण सत्ता गमावल्याने अण्णाद्रमुकमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. विशेषत: ईपीएस समर्थक शशिकला यांना पुन्हा सत्तेच्या राजकारणात येण्यावरून आक्षेप घेत आहेत. अण्णाद्रमुकमध्ये वापसीसाठी ईपीएसही शशिकला यांना मोठा अडसर आहे. कारण “ईपीएस’ला पक्षातील स्थान डळमळीत होण्याचा धोका वाटत आहे.
शशिकला आणि त्यांच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्यासमवेत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. यात क्लिपमध्ये शशिकला म्हणतात की, आपण नक्कीच पक्षात स्थान निर्माण करू. मी परत येईल. आपण कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. आपण पक्षातील सर्वच मुद्दे नक्कीच निकाली काढू. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. या क्लिपच्या माध्यमातून शशिकला यांनी आपल्या समर्थकांना मोठा संदेश आणि संकेत दिला असून तो म्हणजे “वाट पाहा, मी परत येईन’. शशिकला आपले ध्येय साध्य करतील काय, हा एक प्रश्न उपस्थित होतो. अर्थात त्यांचे वय देखील महत्त्वाचे आहे. शशिकला यांना ओळखणारे म्हणतात की, सध्या हा मजबूत पर्याय आहे आणि त्या नक्कीच व्यासपीठावर परत येतील.
दुसरी अडचण म्हणजे त्यांची भ्रष्ट प्रतिमा. त्यांचा पहिला प्रयत्न ए.एम.एम.के म्हणजेच त्यांचा भाचा टी.टी.व्ही दिनकरण यांच्या पक्षाशी हातमिळवणी करण्याचा होता. पण विधानसभेत त्यांनी सपाटून मार खाल्ला. शशिकला आता स्वत:च राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी शिक्षा भोगली आहे. परंतु न्यायालयात अजूनही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. बेहिशेबी मालमत्ता, बनावट नोटा प्रकरणात त्या अडकलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही शशिकलांचे शत्रू आहेत. चौथी गोष्टी म्हणजे शशिकला राजकारणात प्रवेश करण्यासाठी फारशी घाई करत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. कारण त्यांचे लक्ष्य 2024 च्या निवडणुकीकडे आहे. चिन्नम्मांचे भविष्य सध्यातरी अधांतरीत आहे. त्यांची पुढची वाटचाल येणारा काळच सांगू शकेल.