-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
उत्तराखंड येथील अपघात नैसर्गिक होता की देशाच्या शत्रूंनी घडवलेला होता? कारण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये अशाप्रकारे हिमकडा कोसळणे किंवा दरड कोसळणे हे जवळजवळ अशक्य आहे.
नुकतेच उत्तराखंडमध्ये एक हिमकडा किंवा दरड कोसळली आणि त्या खाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. शिवाय तिथे असलेले एक धरण फुटले आणि त्यामुळे नदीकाठाला अचानक पूर आला. जे घडले ती नैसर्गिक आपत्ती होती की घडवला गेलेला घातपात होता याचे संशोधन करण्याकरता डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांचे सायंटिस्ट या भागांमध्ये आता संशोधन करण्यात गुंतलेले आहे. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने या भागात पाठवले गेले.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हिमकडा कोसळण्याकरता लागणारी भौगोलिक आणि नैसर्गिक कारणे पहिल्या पाहणीमध्ये दिसून येत नाही. हिमकडा कोसळण्याकरता अचानक ऊन पडून तापमान वाढावे लागते. सध्या तिथे असलेले तापमान हे उणे 20 डिग्री सेंटीग्रेड एवढे आहे. तिथे नवीन बर्फसुद्धा पडलेला नव्हता. म्हणून अशा अवस्थेमध्ये हिमकडा कोसळणे हे जवळजवळ अशक्य आहे. म्हणून एक शंका निर्माण होते की हा घातपात होता का?कारण अशा प्रकारचे घातपात लांब राहूनसुद्धा केले जाऊ शकतात. चीनने आपल्या सैनिकांच्या/हस्तकांच्या मदतीने अशा प्रकारचा स्फोट केला होता का?
या भागात गढवाल रेजिमेंटचे आणि इतर अनेक सैनिक राहतात. त्या भागात राहणाऱ्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी तिथे स्फोट झाल्याचा आवाज ऐकला आणि हा स्फोट होण्याचा आवाज नैसर्गिक नव्हता, अशा पोस्ट भूतपूर्व सैनिकांच्या सोशल मीडियावर येत होत्या. म्हणून असे वाटते की हा स्फोट केला गेला असावा. अर्थातच यावर पूर्णपणे चौकशी करावी लागेल, जी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांचे सायंटिस्ट करत आहेत. एवढे नक्की की अशा प्रकारचे घातपात चीनने या आधी केलेले आहेत.
वाढत्या पाणीपातळीमुळे 2005 मध्ये हिमाचलमध्ये हाहा:कार माजवणाऱ्या पारछू सरोवराने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली. सरोवराच्या भिंतीला तडे गेल्यास सतलज नदीकाठच्या सुमारे 24 गावांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. चीनच्या तिबेटमध्ये असलेल्या पारछू सरोवराचे आकारमान 34 हेक्टरवरून थेट 100 हेक्टरपर्यंत वाढले. सरोवरात बाहेरून येणाऱ्या प्रवाहाचा वेग जास्त वाढला. पाण्याचा विसर्ग झाला नाही. यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी वाढली आणि अचानक सरोवराचा बांध फुटला आणि हिमाचलमध्ये हाहा:कार माजला.
याप्रकरणाबाबत चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाला सरोवराबाबतची सर्व माहिती या पुढे दिली जाईल, असे आश्वासन चीनने दिले होते. पण त्याचे पालन केले नाही. तिबेटमध्ये वाहणाऱ्या पारछू नदीवर 2004 मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे हे सरोवर तयार झाले होते. हिमनग वितळल्यामुळे पारछू नदीवरील या सरोवरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला. या सरोवराचे आकारमान वाढले असल्याचे रिमोट सेंसिंग सॅटेलाइटद्वारा घेण्यात आलेल्या छायाचित्रातून दिसून आले आहे. आकारमानात वाढ झाल्यामुळे सतलज नदीकाठचे लोक भयभीत झाले.
2013 मध्ये उत्तराखंडामध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपानंतर सर्वत्र हाहा:कार उडाला. ढगफुटीमुळे मुसळधार पावसाने मदतकार्यात व्यत्यय आणले. आभाळ सतत भरून आले. ढगांमुळे आसपासचा प्रदेश दिसेनासा झाला. पावसामुळे नद्या भरून वाहायला लागल्या, रस्ते खचले, पूल वाहून गेले आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. कोसळलेल्या दरडी खाली, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करावी लागली. एका वृत्तपत्राप्रमाणे चीनने क्लाउड सिडिग केल्यामुळे हे झाले असावे, असे म्हटले होते. परंतु आपल्या देशात या दृष्टिकोनातून फारशी चौकशी केली गेली नाही. ब्रह्मपुत्रेचे चीनमधल्या धरणांचे पाणी अचानक सोडले तर काय होईल याची ही रंगीत तालीम तर नव्हती ना?
ब्रह्मपुत्रेच्या वळणाजवळ जर मोठे धरण बांधले, तर ती ईशान्य भारताच्या डोक्यावरील टांगती तलवार ठरेल. चीनसारख्या बेभरवशी देशाकडून भारतावर कुरघोडी करण्यासाठी धरणातले पाणी अचानक सोडण्याची आगळीक केली जाणारच नाही, याची शाश्वती नाही. तसे झाले तर येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसामचा बहुतांश भागाला मोठा धोका होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. म्हणून चीनवरची टेहाळणी वाढवण्याची गरज आहे.
चीनने ही हिमकडा कोसळण्याकरता क्षेपणास्त्राचा मारा केला असू शकतो, अशा काही पोस्ट सोशल मीडियावरती येत आहेत.
झालेल्या अपघातात सीमावर्ती भागाला चीनकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा एकमेव पूल वाहून गेला. भारतीय सैन्य सीमेवर जाण्याकरता या पुलाचा वापर करतात. म्हणूनच सीमावर्ती चीनच्या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देण्याकरता सैन्याचे दळणवळणाचे साधने थोडावेळ थांबवणे हासुद्धा चीनचा एक उद्देश असू शकतो. अर्थातच भारतीय सैन्याच्या इंजिनिअर्सनी लगेच त्या पुलाचे पुनर्निर्माण केले आहे. आतासुद्धा असेच वाटते की, हा घातपात चीनने घडवला असावा. चीन असे का करत आहे?
अर्थातच पद्धतशीरपणे या बाबीचा तपास केला जावा आणि यावरतीसुद्धा संशोधन केले जावे व योग्य निर्णय घेतला जावा. ज्यामुळे जर चीनने भारता विरुद्ध पर्यावरण युद्ध सुरू केले असेल तर आपण लगेचच प्रत्युत्तर देण्याकरता तयार राहू.