-शर्मिला जगताप
“आधी केले मग सांगितले’ अशी वृत्ती आजकाल लोप पावत चालली आहे. “लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ अशी सल्ला देणाऱ्यांची गत झाली आहे. दुसऱ्यांना उपदेश देणे हा सोपा प्रकार. मात्र तोच उपदेश स्वतः तंतोतंत पाळणे महाकठीण काम. आजकाल बरेच उपदेशाचे डोस देणारे अवतीभोवती सहज दिसतात. दारू पिऊ नका असा सल्ला देण्याअगोदर अगोदर स्वतःच दारूच्या थेंबालाही स्पर्श न करणारा असावा. तरच त्याच्या उपदेशाला खरे मोल आहे.
एक लहान मुलगा सारखा साखर खायचा. त्याची आई त्याच्या साखर खाण्याला वैतागली होती. साखर कुठेही लपवून ठेवली तरी हा पठ्ठ्या साखर शोधून मूठभर साखर चारून तोंडात टाकायचाच. साखर खाण्यामुळे त्याची भूक कमी झाल्याने तो थोडसेच जेवन करी. त्यामुळे त्याच्या आईला चिंता वाटू लागली. जेवन कमी झाल्याने तो मुलगा अशक्त दिसू लागला. शेवटी वैतागून त्या माऊलीने गावाबाहेर राहणाऱ्या एका साधूमहाराजांकडे त्या मुलाला घेऊन गेली. तपस्वीच्या डोक्यावर प्रभा, छातीवर रूळणारी पांढरीशुभ्र दाढी आणि कपाळावर ज्ञानाचे तेज होते. साधूमहाराज ध्यानस्त बसले होते. हे दोघे शांतपणे त्यांच्या कुटीत जाऊन बसले.
दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी महाराज त्यांच्यासमोर आले. तसे या माऊलीने मुलाचा प्रताप सांगितला व काहीही करून मुलाची साखर खाण्याची सवय सोडावा, अशी विनंती केली. वर्षानुवर्षे तपस्या करणाऱ्या त्या दिव्य महाराजांचा क्षणभर गोंधळ उडाला. अशी विचित्र समस्या आजवर कुणीही घेऊन आलेले नव्हते. त्यांनी यावर त्या माऊलीलाच त्या मुलाला साखर खाण्यावर नियंत्रण ठेवा, असे सांगून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खूपच वैतागलेल्या त्या माऊलीचा “अवतार’ पाहून शेवटी महाराज थोडावेळ शांत झाले. त्या मुलाकडे त्यांनी क्षणभर एकटक बघितले आणि म्हणाले, “तुम्ही एक महिन्यानंतर या, तोपर्यंत मी काही उपाय शोधून काढतो.’
ते दोघे महाराजांच्या पाया पडले व घरी गेले. महाराजांचे शिष्यही झाल्या प्रकारामुळे हासू लागले. मात्र महाराज चिंतेत पडले. शेवटी एकदाचा महिना उलटला आणि ते दोघे महाराजांच्या कुटीत अवतरले. महाराजांनी आपले डोळे शांतपणे उघडले. त्या मुलाला शेजारी बसण्यास सांगितले. त्या मुलाची आई, आता महाराज काहीतरी उपाय सांगतील म्हणून खूपच आनंदी झाली. तो मुलगा महाराजांशेजारी बसला. महाराज त्याला सांगू लागले, “हे मुला, साखर खाणे चांगली गोष्ट नाही.
जास्त साखर खाल्ल्याने जेवन कमी जाते. म्हणून तू यापुढे साखर खाऊ नकोस.” एवढं बोलून महाराजांनी त्या माऊलीकडे पाहून म्हटले, “माझा उपदेश संपला. त्याला माझा उपदेश पटला असेल तर तो यापुढे साखर खाणार नाही, तुम्ही आता जाऊ शकता.” महाराजांचे हे बोल एकून त्या मुलाची आई चांगलीच भडकली. तिच्या पायाची आग मस्तकात गेली. सर्व बळ एकवटून ती महाराजांवर जवळजवळ ओरडलीच, “अहो बाबा, हा कसला उपदेश, हाच उपदेश करायचा होता तर आम्हाला एका महिन्यानंतर का बोलावले?’ यावर त्या तपस्वी साधूने शांतपणे उत्तर दिले, “हे माऊली, या अगोदर मीही थोडीफार साखर खातच होतो.
मला तुमच्या मुलाला साखर खाऊ नको असा उपदेश द्यायचा होता त्यामुळे मला स्वतःला अगोदर साखर खाणे बंद करावे लागले. त्यानंतर मी याला खरा उपदेश करू शकलो. आता साखर न खाणे यावर या लहानशा मुलाला मी काय उपाय सांगणार?’ महाराजांचे बोल त्या माऊलीला पटले. तिला आपली चूक उमगली व आपणच आपल्या मुलाच्या साखर खाण्यावर नियंत्रण ठेवावे याचा तिला बोध झाला. तर महाराजांच्या शिष्यांना “आधी केले मग सांगितले, हा धडा मिळाला.