“महाराष्ट्र काव्य कोकीळ’ अर्थात सोपानदेव चौधरी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म जळगाव येथे 16 ऑक्टोबर 1907 रोजी प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पोटी झाला. त्यांच्या आईची काव्यप्रसवता त्यांच्याकडे निसर्गदत्त आली. ते शाळेत शिकत असतानाच त्यांनी “गोकुळीचा कान्हा माझा, कुणी कधी पाहिला काय गं’ ही कविता केली. या बाल कवीची ही कविता सर्वदूर महाराष्ट्रभर पोचली व कवी म्हणून त्यांची ओळख झाली.
आपल्या आईच्या अर्थात बहिणाबाईंच्या कवितांची ओळख त्यांनी महाराष्ट्राला करून दिली, हे फार मोठे कार्य त्यांच्याकडून झाले ही साहित्यप्रेमींसाठी विशेष बाब आहे. सोपानदेव आई कविता म्हणू लागली की ते ती कविता उतरून घेत. बरेचदा सोपानदेव कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर असत त्यावेळी बहिणाईंच्या बऱ्याच कविता त्यांना अर्धवट माहीत होत्या. पण सुदैवाने त्या कविता त्यांच्या मोठ्या बहिणीला पाठ होत्या. तिच्याकडून ऐकून त्यासुद्धा त्यांनी लिहून ठेवल्या. त्यामुळे कवितांची वहीच तयार झाली. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या चीजवस्तू पाहताना सोपानदेव व त्यांचे मावसबंधू पितांबर चौधरी यांनी संकलित करून ठेवलेले गाण्याचे बाड सोपानदेवांच्या हाती लागले. या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला आणि “बहिणाबाईंची गाणी’ हा संग्रह प्रकाशित झाला.
वर्ष 1961-1962 सुमारास नाशिक येथे आकाशवाणीने मुद्दाम एक खास कविसंमेलन आयोजित केले होते. त्या वेळी सोपानदेव यांनी त्यांच्या स्वतःच्या कविता तर म्हटल्याच पण रेव्हरन्ड टिळक यांची “पाखरा, येशील का परतून?’ ही कविता अत्यंत सुरेल आवाजात गायली होती. त्यांना वजनदार, दाणेदार पहाडी आवाज लाभला होता. वाणी अतिशय स्वच्छ त्यामुळे त्यांचे गाणे (कविता) ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात असत. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांच्या गायकीचे सूक्ष्म, खोल असे संस्कार त्यांच्या गळ्यावर झाले होते. त्यांनी पलुस्करांच्या गांधर्व संगीत महाविद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले आणि तेथेच संगीताचे अध्यापनही केले. त्यांना चित्रकलेचीही आवड होती, संगीत आणि काव्य एकाच व्यक्तीच्या ठिकाणी येणे म्हणजे दुग्धशर्करा योग्य होता. त्यामुळे त्यांच्या काव्यगायनाला मराठी साहित्य संमेलनांसह इतर कार्यक्रमातही मोठा प्रतिसाद मिळत असे. कवी चंद्रशेखर यांनी त्यांना “महाराष्ट्र काव्य कोकीळ’ ही पदवी दिली होती.
“प्रतापी प्रतापसिंह’, “पुण्यश्लोक महात्मा’ (महात्मा गांधींवरचा पोवाडा) या रचनांप्रमाणेच त्यांनी अहिराणी बोलीतही काव्य रचना केल्या. “काय सांगू माझ्या मोर्याची बल्हारी, आडाचं पाणी लई खोल गं’ यासारख्या त्यांच्या कविता लोक गुणगुणत असत. आली कुठूनशी कानी/टाळ मृदंगाची धून/नाद विठ्ठल विठ्ठल/उठे रोमारोमांतून हे भक्तिगीत कुणी विसरू शकत नाही. “काव्यकेतकी’, “अनुपमा’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. विद्याधर गोखल्यांची प्रस्तावना लिहिलेले छंद “लीलावती’ हे छंदरचनेचे महत्त्व सांगणारे पुस्तक त्यांनी लिहिले. भरपूर उंची लाभलेले आणि बळकट शरीरयष्टी लाभलेले सोपानदेवांना कॅन्सरचे निदान झाले. आठवड्यापुरतेच आयुष्य उरले आहे, असे डॉक्टर म्हणू लागले. पण त्यातून ते सावरले. मात्र नंतर त्यांना आणखी आठ वर्षांचे आयुष्य लाभले. हा एक चमत्कार होता. 4 ऑक्टोबर 1982 रोजी त्यांचे निधन झाले.