इमानदार, प्रामाणिक आणि निष्ठावान प्राणी कोणता, असं विचारलं तर आपसूकच सर्वांना कुत्रा आठवेल. प्राचीन काळापासून माणसाबरोबर या प्राण्याचं अस्तित्व आहे. आपल्यासारखाच प्राण्यांनासुद्धा इतिहास असतो आणि आपापल्या भाषेत, आपापल्या इतिहासाबद्दल प्राणी अभिमानानं बोलतसुद्धा असतील.
दुधासाठी आणि शेतीसाठी माणसाने गायी-म्हशी आणि बैलांना जवळ केलेलं असलं, तरी कुत्र्याला कधी आणि कशासाठी जवळ केलं, हे नेमकेपणानं कुणी सांगू शकलेलं नाही. लांडगा हाच कुत्र्याचा पूर्वज असावा इथंपर्यंत अंदाज बांधले गेलेत. शिवाय, माणसानं केलेली शिकार आगीवर भाजली जात असताना त्या मांसाच्या वासाने कुत्रा माणसाजवळ आला असावा आणि राहिला असावा, असंही मानलं जातं.
धर्मराज युधिष्ठिर जेव्हा स्वर्गात गेले तेव्हा स्वर्गाच्या दरवाजापर्यंत त्यांच्या कुत्र्याने त्यांना साथ केली होती, असं सांगून या प्राण्याची निष्ठा पुराणकथांमधूनही अधोरेखित केलेली आहे. श्रीदत्तात्रेयांच्या आसपास चार श्वान नेहमी दिसतात. कुत्रा घराची राखण करतो, हीसुद्धा अफवा किंवा दंतकथा नव्हे. “कुत्र्यापासून सावध राहा,’ असा नुसता बोर्ड पाहिला तरी चोर बिचकतात हे खरंच आहे. तरीसुद्धा “कुत्रा’ या शब्दाचा वापर अपशब्द म्हणूनच अधिक केला जातो. समोरच्याला अपमानित करण्यासाठी या प्रामाणिक प्राण्याला बदनाम केलं जातं. पण गंमत अशी की, माणसाला “कुत्रा’म्हणणं (हिंदी सिनेमांमुळं) कॉमन झालेलं असताना कुत्र्याला “कुत्रा’ म्हणणं मात्र अवघड होऊन बसलंय.
“घर पाहावं बांधून’च्या धर्तीवर “प्राणी पाहावा पाळून’ असं म्हटल्यास फारसं अनुचित ठरणार नाही. पाळलेल्या प्राण्यावर संबंधिताचं एवढं प्रेम जडतं, की प्राण्याचं नाव घेण्याचीही चोरी होऊन बसते. आमचे एक परिचित त्यांच्या कुत्र्याला “बाळ’ मानतात आणि म्हणतातही! त्याला “कुत्रा’ म्हणायचं नाही, असं प्रत्येक पाहुण्याला बजावतात. इथंपर्यंत एकवेळ मान्य करता येईल; पण कुत्र्याला “कुत्रा’म्हटलं म्हणून माणसं भांडण-मारामाऱ्या करतात, हे श्वानदंशापेक्षा भीषण आहे. तमिळनाडूतल्या एका शेतकऱ्याला या कारणास्तव जीव गमवावा लागला. रायप्पन त्याचं नाव. जाता-येता शेजाऱ्याचा कुत्रा अंगावर येतो, यामुळे तो बेजार झाला होता.
“तुमचा कुत्रा खूपच कडक झालाय. येणाऱ्या-जाणाऱ्याचं तो नुकसान करतो. त्याला साखळीनं बांधून ठेवा,’ असं तो शेजाऱ्याला वारंवार सांगत असे. (अर्थात, “कुत्रा’ हा शब्द न वापरता, अदबीनं त्याचं नाव घेऊन!) परंतु तरी शेजाऱ्यांनी कुत्र्याला खुलंच सोडलं होतं. अनेकांना तो कुत्रा चावला होता. रायप्पनलाही तो अनेकदा चावला होता. मग त्यानं त्या कुत्र्याचं नाव घेणं सोडून दिलं आणि थेट “कुत्रा’ म्हणू लागला. शेजाऱ्यांमध्ये एवढ्यावरून झालेला वाद मारामारीपर्यंत पोचला आणि शेजाऱ्याच्या मारहाणीत रायप्पनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुमारे दोन वर्षांपूर्वी चंडीगडमध्येही एका महिलेनं कुत्र्याचा उल्लेख “कुत्रा’ असा केल्यामुळे त्याच्या मालकानं संबंधित महिलेचा मोबाइल हिसकावून नेला होता. मोबाइल चोरीमागे अन्य कोणतंही कारण नाही, हे समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला होता. तात्पर्य, कुत्र्यावर एकीकडे जिवापाड प्रेम करणारे भेटतात तर दुसरीकडे “कुत्रा’ हा अपशब्द मानणारे! या दोहोंशी काहीही संबंध नसलेल्या, नाकासमोर चालणाऱ्या सामान्य माणसाला मात्र भटक्या किंवा पाळीव कुत्र्यांचा त्रास झाला तरी स्वतःलाच उद्देशून “हाड्’ म्हणावं लागतं.