– अरुण गोखले
सानेबाई टीचररूममध्ये आज इयत्ता तिसरीच्या वर्गात “माझी लेक’ ही कविता कशी शिकवायची याची तयारी करीत बसल्या होत्या.
तेवढ्यात “टीचर! मी आत येऊ का?’ असे शब्द कानावर आले. “या ना… या… बसा.’ त्या म्हणाला.
तेव्हा समोरची स्त्री खुर्चीवर बसत म्हणाली, “मॅडम, मी सीमा पाटील, तुमच्या वर्गातील अनिता पाटीलची आई. तिने मला मागच्याच आठवड्यात तुम्ही भेटायला बोलावले आहे, असा निरोप दिला होता. पण माझी शिफ्ट ड्युटी चालू होती, त्यामुळे येता आले नाही. अनिताबद्दल काही तक्रार आहे का?’ त्यांनी काहीशा काळजीने विचारले.
त्यावर सानेबाई म्हणाल्या, “हे पाहा, तुमच्या लेकीचा अभ्यास, तिचं वर्गातलं वर्तन ह्याबद्दल माझी कसलीच तक्रार नाही. ती वर्गातली एक छान, हुशार मुलगी आहे. माझी तक्रार तिच्याबद्दल नाही तर तुमच्याबद्दल आहे.’ “काय, माझ्याबद्दल?’ त्यांनी आश्चर्याने विचारले.
तेव्हा समजावणीच्या सुरात सानेबाई म्हणाल्या, “हे पाहा सीमाताई, मागच्या आठवड्यात मी वर्गात “माझी आई’ या विषयावर लिहायला सांगितले होते. तेव्हा अनितानेही तुमच्याबद्दल खूप छान लिहिले आहे. पण…’
“पण काय?’ त्यांनी विचारले.
“तिने असे लिहिले होते की मला कपडे, खाऊ, खेळणी हे नको तर मला आई-बाबा, त्यांचं प्रेम, त्यांचा सहवास हवाय. सीमाताई! आपण आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतो. त्यांना कपडालत्ता, वह्या-पुस्तकं, खाऊ, खेळणी हे सारं आपण देतो. प्रसंगी त्यासाठी आपण आपल्याही काही गरजांना मुरड घालतो, हे ठाऊक आहे मला. पण खरं सांगू? मुलांना या वस्तूंपेक्षा आपला अहवास, आपलं प्रेम हवं असत. त्यांची खरी भूक ही त्या गोड खाऊची नसते तर त्यांना हवा असतो गोड पापा. त्यांना आई-बाबांबरोबर दंगामस्ती मौज-मजा करायला, त्यांच्याबरोबर हिंडा-फिरायला जायला हवे असते.’
पुढे सानेबाई म्हणाल्या, “मला वाटत की एक सुजाण पालक म्हणून आपण त्यांची ही खरी भूक ओळखण्यात कुठेतरी कमी पडतो, नाही का?’
सीमाताईंनी “हो’ अशी एक प्रामाणिक कबुली दिली. मी या गोष्टीचा जरूर विचार करीन असं बाईंना अभिवचन दिलं आणि त्या टीचररूममधून बाहेर पडल्या.
आपलेही असेच होते अनेकदा. आपण आपल्या मुलांना खेळणी, खाणे-पिणे, सर्व काही देतो, पण त्यांना वेळ देतो का?