– हेमंत देसाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीत दोन्ही देशांच्या दरम्यान दळणवळण, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा व अन्य एक अशा पाच करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानिमित्त…
“भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे. अस्थिरता, दहशतवाद वा अस्वस्थता नको आहे’, असे प्रतिपादन मोदी यांनी मटुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलताना केले. ओराकांडी हे हिंदू मटुआ समुदायाचे श्रद्धास्थान आहे. भारत तेथे मुलींसाठी एक प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करेल, अशी घोषणा मोदी यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदी यांनी बांगलादेशच्या दौऱ्याचे आयोजन केले, असा आरोप करण्यात येत आहे.
बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना, मोदींनी आपण बांगलादेश स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचा दावा केला. मोदींच्या या वक्तव्यानंतर समाज माध्यमांवरून या दाव्याच्या सत्यतेबद्दल शंका घेणारे अनेक विनोद झाले. तसेच व्यंगचित्रे, मिम्स टाकण्यात आली. प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्याचवेळी नेमके मोदी बांगलादेशात जातात आणि प. बंगालबद्दल भाषण देतात, हे निवडणूक आचारसंहितेचे पूर्णपणे उल्लंघन आहे, अशी टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. मोदींच्या दाढीची वाढ अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या बरोबर उलट असल्याची कठोर टीकाही त्यांनी केली.
वास्तविक करोना संकटामुळे तब्बल सोळा महिने मोदी देशाबाहेर गेलेच नव्हते. त्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा. गेल्यावर्षी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, नागरिकत्व कायद्याची गरज नव्हती, अशी टीका बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केली होती. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुलमोमीन यांनीही या कायद्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 31 डिसेंबर, 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, जैन, शीख, पारसी, बौद्ध आणि ख्रिश्चन या धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. मात्र याबाबतीत मुस्लिमांचा अपवाद आहे. या कायद्यावरून आसाम, प. बंगालमध्ये निवडणूक प्रचारात टीका करण्यात येत आहे. नागरिकत्व कायद्याचा फटका भाजपला बसेल, असेही सांगितले जात आहे.
मात्र, हे झाले धार्मिक व भावनात्मक राजकारणाचे मुद्दे. परंतु गेल्या दशकभरात बांगलादेशने चमकदार आर्थिक कामगिरी बजावून, दक्षिण आशियाई देशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांगलादेशचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे. तेथील विकासदर आपल्यापेक्षा अधिक असून, आर्थिक विषमतेचे प्रमाण कमी आहे. सामाजिक निर्देशांकाच्या संदर्भातही तो वरचढ आहे. 1971 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या, म्हणजेच सराउच्या एक सप्तमांश इतकी परकीय मदत मिळत असे. आज ते प्रमाण फक्त दोन टक्के आहे. म्हणजेच विदेशी मदतीच्या टेकूची बांगलादेशला आता गरज उरलेली नाही. वित्तीय तूट, रोजगार, खास करून महिला रोजगार, विदेश व्यापारसंतुलन याबाबतीत बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा तळपती आहे.
भारतापेक्षा बांगलादेशच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा सराउमधील वाटा अधिक आहे. 2011-19 या कालावधीत भारताची व्यापारी निर्यात सरासरी एक टक्कादेखील नव्हती. तर बांगलादेशची ती साडेआठ टक्के होती. सराउच्या तुलनेतील गुंतवणूक तसेच सार्वजनिक कर्ज यांच्या गुणोत्तराच्या संदर्भात बांगलादेश भारताच्या पुढे आहे. शेख हसीना यांचा देश भारताच्यापुढे गेला आहे, तर पाकिस्तानची काय कथा? अर्भक मृत्यूचे पाकिस्तानातील सरासरी प्रमाण बांगलादेशच्या दुप्पट आहे. सर्व सामाजिक
निर्देशांकाच्या बाबतीत पाकिस्तान बांगलादेशच्या अनेक कोस मागे आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानवर प. पाकिस्तानातील पंजाबींचे वर्चस्व होते. त्यांनी पूर्व पाकिस्तानचे केवळ आणि केवळ शोषणच केले. मात्र, आता बांगलादेश प्रगतीपथावर असल्यामुळे तो अल्पविकसित देश राहिलेला नाही. तो विकसनशील देश बनला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील त्याला मिळणारे काही लाभ कमी होणार आहेत. खासकरून, प्रगत बाजारपेठा. विशेषतः युरेपियन युनियनमध्ये बांगलादेशचा माल व सेवांना कोटामुक्त प्रवेश असे, तसेच आयातशुल्के कमी असत वा ती पूर्णपणे माफ असत. एकूण निर्यातीतील 80 टक्के वाटा हा कापड आणि कपडे यांचा आहे.
विशिष्ट क्षेत्र केंद्रित निर्यात असल्याचा फटकाही बांगलादेशला बसू शकतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत भारत बांगलादेशच्या किंचित पुढे आहे. उलट बांगलादेशातील आरोग्यसेवा अधिक चांगल्या आहेत. एकूण मानवी विकास निर्देशांकात बांगलादेशच्या तुलनेत भारताची कामगिरी किंचित सरस आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर चोवीस वर्षांनी बांगलादेश अस्तित्वात आला. धर्मवाद, दहशतवाद, गरिबी, बेकारी यांनी घेरलेला हा देश होता.
विरोधातील बेगम झिया यांच्या पक्षाने कट्टरतावादाला खतपाणी घातले. तसेच केवळ आणि केवळ भारतविरोधाचे राजकारण केले. या सर्व विरोधकांस तोंड देऊन, प्रसंगी त्यांच्या मुसक्या आवळून, शेख हसीना यांनी बांगलादेशात विकासाचा मार्ग प्रशस्त केला. विद्वेषाच्या फेऱ्यात सापडलेल्या देशात शिक्षण, आरोग्य, बचत, गुंतवणूक व उत्पादन या पंचसूत्रीवर भर देऊन, विकास साधणे हे कठीण काम शेख हसीना यांनी करून दाखवले. त्यांनी रोजच्या रोज भाषणे न करता आणि “मन की बात’चे इव्हेंट न करता, फक्त “काम की बात’ केली. बांगलादेशच्या भेटीनंतर मोदींनी एका लहान देशापासून जर स्फूर्ती घेतली, तर तोच त्यांचा खरा सत्याग्रह ठरेल!