-शर्मिला जगताप
“परिवर्तनाची पहाट’ हे पुस्तक शुभांगी कोपरकर यांनी लिहिले आहे. अहमदनगरच्या लालबत्तीचे कशाप्रकारे परिवर्तन घडून आलं, हे सांगणारं हे पुस्तक आहे.
“रेड लाइट’ किंवा “लालबत्ती’ म्हटले की, आपण नाक मुरडतो. मात्र हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनात “या स्त्रियां’विषयी एक आपुलकीचा प्रेमळ झरा प्रवाहित होतो. या स्त्रियांविषयीचा आपल्या मनातील पूर्वग्रहाला छेद देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.
अहमदनगरमधील लालबत्ती भागात जसं मोठं परिवर्तन घडून आलं, तिथला बकालपणा दूर झाला, अत्याचारांना आळा बसला, देहविक्रय करणाऱ्या महिलांना जगण्याचे सारे अधिकार प्राप्त झाले, त्यांचं आरोग्य सुधारलं, त्यांची मुलं शिकू लागली. तसाच बदल देशभरातील साऱ्या लालबत्ती भागांमध्ये झाला पाहिजे. अशी भूमिका हे पुस्तक मांडते.
कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. ह्या स्त्रियांना इतर कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे, अशी भूमिका हे पुस्तक वाचताना वाचकांची होते. अर्थात, त्यांच्या ज्या अनेक व्यथा आहेत त्यांपैकी समाजाकडून मिळणारी तिरस्काराची वागणूक, तुच्छतेची वागणूक ही सर्वात मोठी व्यथा आहे. त्यांची राहणी, त्यांची भाषा, त्यांची देहबोली हे त्या तिरस्कारासाठी काही अंशी कारणीभूत आहेत, पण समाजानं निदान त्यांच्या कामाविषयी अढी मनातून काढून टाकून सहानुभूतीच्या भावनेनं त्यांच्याकडे बघायला हवं. देहविक्रय आणि अनैतिक मानवी वाहतूक ह्या प्रश्नांशी निगडित इतर अनेक प्रश्नांकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला लावणारं हे पुस्तक आहे.
देहबाजारात बळजबरीनं वा असहाय्यतेनं आलेल्या स्त्रिया, वाईट मार्गाला लावली गेलेली अल्पवयीन मुलं, जन्मदात्यांनी टाकून दिलेली बाळं, दुर्दैवानं एचआयव्हीची शिकार बनलेली कुटुंब, पोटच्या मुलांनी झिडकारलेली म्हातारी माणसं, अपंग व्यक्ती ह्या साऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडून आणण्याची एकप्रकारची शिकवणच हे पुस्तक देऊन जाते. आशेचा किरण घेऊन सूर्योदय व्हावा. उगवतीची प्रभा जेव्हा सर्वंदूर पसरेल तेव्हा खऱ्या अर्थाने दूरगामी परिवर्तन घडून येईल आणि त्यातूनच एक खराखुरा प्रगत समाज साकार होईल, असा क्रांतिकारी विचार वाचकांच्या मानात येतो.
पुस्तक जसंजसं पुढे जात राहते तशी वाचकांची उत्सुकता आणखी वाढते. पुस्तकाची मांडणी आणि ओघवती भाषाशैली यामुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच त्याचबरोबर आपल्या मनाला काटे टोचतील अशा प्रसंगांचेही हुबेहूब चित्र आपल्या समोर उभे करण्यास लेखिका यशस्वी झाली आहे. समाज शुद्ध, निर्मळ, पावित्र्य राहण्यासाठी अगोदर आपल्याच मनातील घाण काढून टाकण्याचा संदेश हे पुस्तक देते.