-शैलेश धारकर
दिल्लीने 71 वर्षांमधील सर्वांत थंड नोव्हेंबर महिना यावर्षी अनुभवला. महाराष्ट्रातही येणाऱ्या काळात विदर्भ, मराठवाड्यात पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला एल-निनोचा परिणाम तसेच पश्चिमी विक्षोभ प्रभावी नसणे हे घटक कारणीभूत आहे. थंडीची मोठी लाट देशभर अपेक्षित असल्याने एका अत्यंत कठीण अशा वर्षाची तितकीच कठीण सांगता आपल्यासमोर उभी आहे, असेच म्हणावे लागेल.
उत्तरेच्या पहाडी प्रदेशात झालेल्या हिमवर्षावाबरोबरच उत्तर भारताच्या पठारी प्रदेशात थंडीचा कडाका वाढणे ही काही नवीन गोष्ट नाही. नवीन गोष्ट अशी की, काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्याच महिन्यात हवामान विभागाने सांगितले होते की, दिल्लीने 71 वर्षांमधील सर्वांत थंड नोव्हेंबर महिना यावर्षी अनुभवला. या परिस्थितीला एल-निनोचा परिणाम तसेच पश्चिमी विक्षोभ प्रभावी नसणे हे घटक कारणीभूत असल्याचे या विभागाने म्हटले होते. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये झालेला कमी पाऊस आणि ढगांची कमतरता हीसुद्धा कारणे त्यामागे असल्याचे सांगितले आहे. परंतु वास्तव असे आहे की, संपूर्ण हवामानाच्या चक्रातच आपल्याला चक्रावून टाकणारे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याने राजधानी दिल्लीत 1901 नंतरचा सर्वांत थंड डिसेंबर महिना ठरण्याचा विक्रम नोंदविला होता. त्याचप्रमाणे ज्या गतीने किनारी भागात वारंवार वादळे येऊन धडकत आहेत, तीसुद्धा निसर्गाची प्रवृत्ती वेगाने बदलत असल्याचेच आपल्याला सांगतात. या गोष्टीवर केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण जगाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
प्राध्यापक माल्थस यांनी 222 वर्षांपूर्वी निसर्गावर वाढत्या मानवी दबावासंबंधी जे विचार मांडले होते, ते खोडून काढण्याचीच स्पर्धा नंतरच्या काळात पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे वेगाने वाढत असलेल्या मानवी लोकसंख्येच्या सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी निसर्गाचे अविवेकी दोहन करण्याची प्रवृत्ती सातत्याने वाढत गेली. परंतु कोविड-19 च्या आजच्या काळात संपूर्ण जगाच्या वेगाला खीळ बसलेली असताना, जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले असताना आणि लाखो रुग्णांचे जीव टांगणीला लागलेले असताना त्या अर्थतज्ज्ञाने मांडलेल्या विचारांकडे नव्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दुष्काळ, महामारी आणि वादळांसारख्या घटनांनी सृष्टी आपले संतुलन साधेल, असे त्यांचे शब्द होते. सर्वांत दुर्दैवी गोष्ट अशी, की निसर्ग आपल्याला सातत्याने संकेत देत आहे; परंतु मानव या संकेतांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. विशेषतः जे देश त्यांच्याकडील वैज्ञानिक प्रगतीमुळे विकसित देश बनले आहेत, ते देश या बाबतीत अत्यंत बेफिकिरीचे धोरण स्वीकारताना दिसतात. परंतु आता युरोपात उन्हाळा दरवर्षी नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत असताना या देशांच्या विचारप्रक्रियेत बदल होतील, अशी अपेक्षा आहे.
भारताचा विचार करता तूर्तास आपल्या हवामान विभागाने आगामी काही दिवसांत थंडी आणखी वाढत जाण्याचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस देशात नेहमीच थंडीची लाट येते. जेव्हा थंडीची लाट येईल, तेव्हा विशेषतः उत्तरेकडील राज्यांची सरकारे आणि लोकांच्या दृष्टीने तो कसोटीचा काळ ठरेल. राज्य सरकारांपुढील सध्याचे सर्वांत मोठे आव्हान करोनाच्या संकटावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्याचे आहे. अशा स्थितीत शारीरिक अंतर राखण्याचा जो प्रोटोकॉल आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे, त्याचे पालन हिवाळ्याच्या दिवसांत केले जाणे अवघड आहे. मोठ्या शहरांतील वसाहती संसर्गमुक्त राखण्याचे आव्हान आहे, तर दुर्गम भागांत थंडीच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांच्या व्यवस्थेविषयी निर्णय घेणेही अवघड आहे.
अशा वेळी दरवर्षी नागरी समाजातील परोपकारी लोक पुढे येतात आणि गरजू व्यक्तींना गरम कपडे आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू पुरवितात. यावर्षी वंचित घटकांना अशा व्यक्तींच्या करुणेची आणि मदतीची अधिक गरज भासेल असे चित्र आहे. अत्यंत कठीण अशा वर्षाची तितकीच कठीण सांगता आपल्यासमोर उभी आहे.
या काळात आपल्याला निसर्गाच्या प्रकोपापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजनाही करायच्या आहेत आणि आगामी काळात निसर्गाशी ताळमेळ राखत जीवन जगण्याचे नवीन मार्गही शोधायचे आहेत. हा दूरचा विचार आपण आताच केला नाही,
तर निसर्ग आपल्यासाठी नेहमीच असा भीतीदायक राहील.