-सागर ननावरे
पहिल्या पावसासाठी ढगांची जमवाजमव सुरू झाली की, प्रत्येकाचा मनमयूर आनंदाने नाचू लागतो. पावसाच्या आगमनाची चाहूल हर्षाने मन ओलेचिंब करते. हवालदिल शेतकरी तर अगदी चातकाप्रमाणे आतुर असतो. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदोत्सव असतो.
बहिणाबाईंच्या कवितेतील ओळी आहेत-
आधी हाताला चटके… मग मिळते भाकर
अशीच अवस्था शेतकऱ्याची असते-
आधी उन्हाचे चटके… मग भिजते रान
पावसाळा आला की, तरुणाईला वेध लागतात ते वर्षापर्यटनाचे. धो धो बरसणारा पाऊस, हिरवीगार भूमी आणि त्यात धुक्याची चादर. सारे काही अगदी विलोभनीयच आणि अशा या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रयत्न निसर्गप्रेमी आतुर झालेले असतात. लोणावळा, खंडाळा, पाचगणी, गिडकिल्ले, धबधबे, धरणे आणि इतर पर्यटन स्थळे सज्ज असतात. अशा या विविध ठिकाणी पर्यटक तोबा गर्दी करीत असतात. सकाळी उठून वर्तमानपत्र हाती घेतले की निसर्गाच्या सौंदर्याच्या कामेऱ्यात टिपलेल्या प्रतिमा मनाला ओढ लावतात. आपणही या निसर्गाच्या सौंदर्य सोहळ्याला उपस्थित राहावे अशी भावना मनात येऊन जाते.
परंतु हा आनंद काही क्षणापुरता ठरतो. वर्तमानपत्राचे पान पलटताच अपघाती बातम्या ऐकून मन सुन्न होते. या बातम्या असतात पर्यटन स्थळांना भेटी देताना केलेल्या निष्काळजीपणाच्या मनुष्यहानीच्या. जबाबदारीचे भान सोडून भावनेच्या आहारी जाऊन उचललेले बेफिकीर पाऊल कसे जीवावर उठते हे वाचताना अंगावर काटा येतो. त्यातही आजकाल मोबाइल चित्रणाची सोय उपलब्ध असल्याने मरणाचे चित्रण “याची देही याची डोळा’ पाहणे थरारक ठरते. विविध माध्यमे, दुरचित्र वाहिन्यांना, त्यावरील चर्चांना हा विषय बातमीसाठी पुरेसा ठरत असतो. परंतु या जीवघेण्या बेजबाबदार पर्यटनावर उपाययोजना काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.
यंदा या पावसाळ्याच्या निमित्ताने याबाबत उपाययोजना आणि खबरदारी घेणे योग्य वाटते. कारण निष्काळजीपणाचे अजून किती बळी आपण द्यायचे याचा विचार होणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्ती रोखणे हे नक्कीच सहज शक्य नाही. परंतु वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन या संकटावर मात करणे नक्कीच आपल्या हाती आहे. या दुर्दैवी बातम्यांना कुठेतरी पूर्णविराम देण्यासाठी उपाय हवेत. यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. सेल्फी काढताना मर्यादा ओलांडून थेट मरणाच्या दारात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात दुर्घटना होऊन लोकांना जीव गमवावा लागू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर अनेक ठिकाणी प्रशासन उपाययोजनाही अमलात आणत आहे.पावसाळ्यातील पर्यटनाचे हे धोके ओळखून गेल्या महिन्यातच गोवा सरकारने एक उपक्रम राबवला. हा उपक्रम म्हणजे “नो सेल्फी झोन’.
भारतातल्या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असणारे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणजे गोवा. गोव्यातील विविध पर्यटन स्थळांवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यात अनेक विदेशी पर्यटकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. हेच लक्षात घेऊन गोवा सरकारने “नो सेल्फी झोन’ हा उपक्रम जून अखेरीस सुरू केला आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभीच डझनभर पर्यटकांना जलसमाधी मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. गोवा सरकारने काही दिवसांपूर्वीच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दृष्टी मरीन या संस्थेची नेमणूक केली आहे. त्यात सुमारे 105 किलोमीटरच्या किनाऱ्यावर 650 जीवरक्षक तैनात केले आहेत. या जीवरक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी लाल झेंडे लावून अशा ठिकाणी पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच बरेच समुद्रकिनारे सीसीटीव्ही खाली आणण्यात आले आहेत. हौशी सेल्फी प्रेमींना वचक बसावा म्हणून 26 धोकादायक ठिकाणे ही “नो सेल्फी झोन’ म्हणून जाहीर केले आहे.
हाच प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथेही राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने धोकादायक सेल्फी स्पॉटला “नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित केले आहे. तसेच आपत्तीजनक सुरक्षा यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही पर्यटकांना दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
आज पर्यटनातील धोके टाळण्यासाठी ज्याप्रमाणे प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीही सतर्क राहून जबाबदारीने वागणे तितकेच गरजेचे आहे. अतिउत्साहाने नियमांचे उल्लंघन करून जीवाशी खेळणे अजिबात योग्य नाही. प्रशासनाने “नो सेल्फी झोन’सारख्या योजना अंमलात आणून “जरा जपून जा रे… पुढे धोका आहे’ची जाणीव करून दिली आहे. मात्र आता गरज आहे ती नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याची. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असलेली धोकादायक ठिकाणे टाळली पाहिजेच. पर्यटनस्थळी अनेक माहितीफलकांवर दिलेल्या सुरक्षेच्या सूचना पाळायला हव्यात. सेल्फी, व्हिडिओ, फोटो यासारख्या क्षणभंगुर समाधानासाठी जीव धोक्यात घालणे योग्य नाही.
पावसाळ्यात धोकादायक ठिकाणांवर जाणे हे शहाणपणाचे नाही. आपले सोबती, कुटुंबीय या सर्वांनाच त्रासदायक ठरणारी कृती टाळलेलीच बरी. निसर्गाचा निखळ आनंद घेताना धोका जाणून घेऊन तो टाळला पाहिजे. उगाच काहीतरी माकडचाळे करून ते मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करायच्या नादात अनेक दुर्घटना घडतात. आपण सतर्क राहून निसर्ग सौंदर्याचा आनंद मोबाईलमध्ये घेण्यापेक्षा ते क्षण जगले पाहिजेत. आपल्या आनंददायी पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. जबाबदारीने वागण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अशा ठिकाणी जाताना एक विचार आवर्जून करावा की, घरी आपली कुणीतरी आतुरतेने वाट पाहतंय.