श्रावण सुरू असल्यामुळे खवय्यांना जिभेवर ताबा ठेवावा लागतोय. संयमाची परीक्षा देता-देता अनेक वाघांच्या शेळ्या झाल्यात. ही व्रतवैकल्यं, उपासतापास का केले जातात? या प्रश्नाला असंख्य उत्तरं दिली जातात आणि त्यातली बहुतांश बरोबरही असतात.
विशेषतः श्रावणातल्या व्रतांविषयी बरीच विज्ञानाधारित माहिती दिली-घेतली जाते. पूर्वी ही माहिती तोंडीच दिली जायची, आता सेवेसी सोशल मीडिया आहे. व्हॉट्सऍप विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्यवहारातील परीक्षा कठीण जातात, असा एकंदरित अनुभव असला तरी श्रावणाच्या बाबतीत बऱ्यापैकी खरं ज्ञान या विद्यापीठातून मिळू शकतं. अगदीच फायदा नाही झाला, तर किमान तोटा तरी होत नाही.
पावसाळ्यात जिभेवर संयम नसल्यास पोट किंवा एकंदर प्रकृतीच बिघडू शकते इथपासून बहुतांश प्राण्यांचा हा प्रजननकाळ असल्यामुळे मांसाहार टाळावा, इथंपर्यंत कोणत्याही कारणानं मनावर थोडासा संयम ठेवण्याची सवय लागली तर चांगलंच आहे ना! पण ज्या साधनांमधून हे ज्ञानामृत मिळतंय, त्याचाच उपास घडला तर..? विचार मनात आला आणि आम्ही तो मित्राला बोलूनही दाखवला. त्याच्या तोंडून ताबडतोब “ई-व्रत’ हा शब्द बाहेर पडला. ही त्याचीच क्रिएटिव्हिटी असावी, असा अंदाज होता. परंतु महानगरांमधील लोकांनी “ई-व्रत’ ही संकल्पना स्वीकारायला सुरुवात केलीये, अशी माहिती त्यानेच दिली. आठवड्यातून एक दिवस माहितीच्या देवाणघेवाणीशी संबंधित सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर राहणं, असा त्याचा अर्थ!
बापरे! गॅजेट्सचं ऍडिक्शन झालेली एखादी व्यक्ती ऐकूनच चक्कर येऊन पडेल. पण परदेशांमध्ये “नो सेलफोन डे’ ही काही नवीन संकल्पना राहिलेली नाही. आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं, तर आश्चर्य वाटायला नको. कारण “माहितीचं युग अवतरलं’ असं ओरडून प्रारंभी आपण जो अतिरेकी उत्साह दाखवला, त्याचा शेवट “माहितीचं अजीर्ण’ हाच असू शकतो. रोज आपल्या डोळ्यांवर आघात करणाऱ्या माहितीचा इतका महापूर वाहत असतो, की त्यामुळे आपण जगणंच विसरून चाललोय.
विशेष म्हणजे, आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या माहितीपैकी पन्नास टक्के निरुपयोगी असते, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. सर्वच क्षेत्रातल्या माणसांना सर्वच क्षेत्रातली माहिती कशी उपयुक्त असेल? उपयुक्त आहे, असं घटकाभर मानलं तरी रोज डोक्यावर आदळणाऱ्या माहितीपैकी किती टक्के आपल्या लक्षात राहते, याची उजळणी प्रत्येकानं मनातल्या मनात करून पाहावी. शिवाय, मिळणाऱ्या माहितीत नकारात्मक माहितीच जास्त असते. बॅंकिंगशी संबंधित इंटरनेटाधारित घोटाळ्यांविषयी वाचून अनेकजण आपल्या बॅंक खात्याच्या चिंतेनं पांढरेफट्ट पडतात. या पार्श्वभूमीवर, एक दिवस सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल गॅजेट्स बंद ठेवून 24 तास कोणतीही माहिती मेंदूवर आदळू द्यायची नाही, अशा निर्धारासह “ई-व्रत’ ट्राय केलं तर..? उरलाय आपल्याकडे एवढा संयम?
श्रावणानं संयमाचा महिमा सांगितलाय, असं आपण खरंच मानत असू, तर हे व्रत एकदा ट्राय करून बघितलं पाहिजे. किती तासात सुटेल आपला संयम? किती तासात आपण “ई-उपवास’ सोडू? प्रत्येकानं मनाला खरं उत्तर दिलं पाहिजे. अर्थात, ज्यांनी हा अनुभव घेतला, त्यांना खूप मोकळं-मोकळं वाटलं, हेही महत्त्वाचं आहे. आपल्याला बोलता-ऐकता येतं, आपलं एक कुटुंब आहे, असे साधे-साधे साक्षात्कार होणार असतील, तर होऊन जाऊदे एखाद्या दिवशी!