गेल्या काही दिवसांपासून सुएझ कालवा चर्चेत होता तो तेथे अडकून पडलेल्या एका भल्यामोठ्या जहाजामुळे. या घटनेमुळे जगभरातील व्यापारावर गंभीर परिणाम होऊ लागला होता. हे मालवाहू जहाज चीनहून नेदरलॅंडला निघाले होते. हे अडकलेले जहाज काढण्यास अनेक दिवस लागू शकतात असे सांगितले जात होते. पण अखेर या जहाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. 400 मीटर लांब आणि 59 मीटर रुंद असे हे अवाढव्य जहाज होते. अडकून पडलेले हे जहाज ओढण्यासाठी नऊ जहाजे घटनास्थळी आणण्यात आली होती.
वाळू उपसणारे यंत्रही कार्यान्वित करण्यात आले होते. वेगवान वाऱ्यामुळे नियंत्रण सुटून हे जहाज वाळूत रुतून बसले. या घटनेमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या असंख्य जहाजांचा मार्ग रोखला गेला होता. सुएझ कालव्यात अडकून पडलेले आजवरचे हे सर्वांत मोठे जहाज होते. जर जहाज तेथून काढण्यात लवकर यश आले नसते तर सर्वप्रथम त्यावर लादलेला माल काढून घ्यावा लागला असता आणि मग जहाज काढण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू करावा लागला असता. यापूर्वी 2017 मध्ये सुएझ कालव्यात अडकलेल्या जपानच्या जहाजाने असाच इतर जहाजांचा मार्ग रोखला होता. परंतु इजिप्तने हे जहाज काढण्यासाठी अनेक जहाजे तैनात केली होती आणि काही तासांतच मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा महासागरात ट्रॅफिक जाम झाले होते. अशा प्रकारच्या घटना अतिशय दुर्मिळ असल्या तरी त्या घडल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होतो. या कालव्यात सुएझ कालवा प्राधिकरण आणि स्मिट सालवेज या डच कंपनीकडून आजमितीस रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
अडकलेले जहाज काढण्यासाठी अनेक युक्त्या योजल्या जात होत्या. कालव्याच्या किनाऱ्यांवर जेसीबीसारखी यंत्रसामग्री वापरून माती हटविण्यात आली आणि ड्रेजरच्या साह्याने जहाजाच्या खालची मातीही हलविण्यात आली. रविवारी पहाटे भरती आल्यामुळे पाण्याची पातळी थोडी वाढली आणि त्यामुळे जहाजाला तरंगण्यासाठी मदत मिळाली. सुएझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख ओसामा राबे यांनी सांगितले की, दहा महाकाय जहाजे या अडकलेल्या जहाजाला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. जहाजाचा मागील भाग म्हणजेच स्टर्न किनाऱ्यापासून केवळ चार मीटर अंतरावर होता. सोमवारी तो किनाऱ्यापासून 102 मीटर दूर नेण्यात यश मिळाले होते. परंतु जहाजाचा “बो’ म्हणजे पुढील भाग लवकर मोकळा होऊ शकला नाही. कालव्याच्या किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आल्यामुळे जहाज अडकल्याचे सांगितले जात आहे.
जहाज अडकल्यामुळे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यादरम्यानची मालवाहतूक पूर्णपणे थांबली होती आणि जागतिक व्यापारापुढे मोठे संकट उभे राहिले होते. या संकटाचा भारतावरही परिणाम दिसून आला. या कालव्यातून दररोज सुमारे 50 जहाजे प्रवास करतात. या कालव्याचा उपयोग प्रामुख्याने आखाती देशांपासून युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी होतो. सुएझ कालव्यातून होणारा व्यापार एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 10 ते 12 टक्के एवढा आहे. सुएझ कालव्यातून दर तासाला 40 कोटी डॉलरच्या मालाची वाहतूक होते. या आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, जहाज अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा फटका बसला आहे. आशिया आणि युरोप यांच्यामधील छोटा सागरी दुवा म्हणूनही सुएझ कालव्याचे महत्त्व मोठे आहे. सुमारे 193 किलोमीटर लांबीच्या या कालव्यात काही नैसर्गिक कालवेही येऊन मिळतात.
जागतिक व्यापाराचा कणा मानल्या जाणाऱ्या या कालव्यात 40 पेक्षा अधिक मालवाहू जहाजे आणि सुमारे तीन डझन तेलवाहू जहाजे मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करीत होते. या कालव्यातून दररोज 9.5 अब्ज डॉलर किमतीची मालवाहू जहाजे प्रवास करतात. सर्वच देशांना सुएझ कालव्याचे महत्त्व माहीत आहे, कारण जगभरात मालवाहतुकीसाठी हाच महत्त्वाचा मार्ग आहे. मालवाहू आणि तेलवाहू जहाजे अडकून पडल्याने कच्च्या तेलासह युरोपात खाद्यपदार्थ आणि अन्य उत्पादने पोहोचणे बंद झाले होते. युरोपातूनही कोणताही माल बाहेर पाठविणे सध्या बंद करण्यात आले होते. कच्च्या तेलाचा पुरवठा वेळेवर न झाल्याने किमती 2.5 टक्क्यांनी वाढल्या होत्या. जहाजाची मुक्तता झाली नसती तर तेलाच्या किमतीत पाच टक्के वाढ होऊ शकते, असे सांगण्यात आल्यामुळे अनेक देशांचे धाबे दणाणले होते.
आता युरोपाच्या विविध बंदरांवर एकाच वेळी अनेक जहाजे पोहोचतील त्यामुळे बंदरांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुरवठा बंद झाल्याने अनेक वस्तूंच्या किमती वाढतील. दोन्ही स्थितीत उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होणे निश्चित आहे आणि त्यामुळे जगभरात या वस्तूंच्या किमती वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
करोनाच्या महासंकटामुळे जगाची अर्थव्यवस्था मुळातच खिळखिळी झालेली असताना हा आणखी एक धक्का बसला असता. तेलाची आयात अधिक प्रमाणात करणाऱ्या देशांना पर्यायी देशांकडून, पर्यायी मार्गाने कच्चे तेल घ्यावे लागण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या स्थितीत अशा देशांमध्ये तेलाच्या किमती वाढणे अटळ होते. पण अखेर 11 टगबोटींच्या साहाय्याने हे जहाज बाजूला करण्यात यश आले आणि जगाने सुटकेचा निःश्वास टाकला!