– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस. भागवत धर्माच्या उत्तुंग आणि गगनचुंबी मंदिराच्या कलशस्थानी संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी सांप्रदायाचे यशोशिखर आहे. आज तुकारामबीज. त्यानिमित्त…
तुकाराम या चार अक्षरांमध्येच चार वेद, चार मुक्ती आणि चार पुरुषार्थ सामावलेले आहेत. “तुका म्हणे’ या दोन शब्दांमध्ये इतके सामर्थ्य आहे की, तुका म्हणे या शब्दांनीच आपली पहाट होते तर त्याच शब्दांनी आपण निद्राधीन होतो. तुकाराम या शब्दाचा विग्रह करण्याची संधी अनेक विचारवंतांना मिळाली. पण त्यांचा आकाशाएवढा अर्थ पाहून तेच त्यात सामावून गेले.
अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशाएवढा ।।
केवळ संत म्हणून अवतीर्ण होणे हा तुकोबांचा उद्देश निश्चितच नव्हता. शिवपूर्व कालातील निद्रिस्त किंवा झोपेचे सोंग घेतलेल्या जगाला पूनर्जीवित करण्याचे कार्य तुकोबांना करावयाचे होते. सामाजिक अथवा धार्मिक क्षेत्रात वाममार्गाला लागलेल्या समाजाला योग्य जीवन प्रवाहात आणण्याचे कार्य तुकोबांनी लीलया पार पाडले.
बुडता हे जन न देखवे डोळा ।
येतो कळवळा म्हणउणी ।।
जागतिक पातळीवर फक्त संत तुकाराम महाराजांचे अभंगरूपी काव्यच मराठीचे प्रतिनिधित्व करू शकते हे सिद्ध झाले आहे. म्हणून त्यांच्या तुकारामगाथेला कळसाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या काव्यातून आत्मानुभूती प्रकट झाली, त्यामुळेच आत्मप्रत्यय हे तुकोबांच्या विचारांचे अधिष्ठान आहे.
आले अंगा । ते या जगा देतसे ।।
तुकोबांच्या हितशत्रूंनी त्यांच्याकडे एक गणिका वाईट हेतूने पाठवली होती. त्यावेळी त्या स्त्रीला हात जोडून माता म्हणणारे केवळ तुकोबाच असू शकतात. चारित्र्यसंपन्न समाजाने परनारीपासून दूर राहून परनारीला सदैव माताभगिनीच्या रूपात पाहावे हाच संदेश तुकोबा या प्रसंगातून देतात.
जाई वो तू माते न करी सायास ।
आम्ही विष्णूदास तैसे नोहे ।।
अशा प्रसंगातून तुकोबारायांनी समाजाला चारित्र्यसंपन्न आणि वैचारिक संपन्न बनवण्यासाठी अभंगांच्या माध्यमातून आत्मविश्वास प्रदान केला. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती आणि मन:स्थिती बदलण्याचे सामर्थ्य तुकोबारायांच्या चरित्रात आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या अभंगांच्या आणि चरित्राच्या अनुषंगाने तुकोबारायांनी सर्व मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत.
काय सांगू या संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ।।
पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने तुकोबांच्या बुद्धीला वेदार्थाचे स्फुरण आले, म्हणूनच तुकारामगाथेला पंचमवेद किंवा तुकोपनिषद म्हणतात. त्यांच्या वाणीतून सहज बोल बाहेर पडतात पण त्यातून वेदांचा अर्थ प्रकट होतो.
मी वासुदेव तत्वता ।
कळो येईल विचारिता ।।
या चरणातून यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा अर्थ प्रकट होतो तर
देवची बरे देवची बरे ।
तुका म्हणे खरे तुम्ही ।।
या चरणातून सामवेदातील छान्दोग्य उपनिषदातील तत्वमसि (तत्, त्वम असी) या महावाक्याचा अर्थ प्रकट होतो. जातीपाती, अंधश्रद्धा, आत्महत्या, हिंसा, बुवाबाजी आणि मानसिक आरोग्य अशा अनेक विषयांवर तुकोबांनी भाष्य केले आहे. त्यांची सतराव्या शतकातील शिकवण आपणाला आजही काळाच्या मर्यादा ओलांडून आपलीशी वाटते.
बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी ।
पडिले प्रसंगी काळा ऐसे ।।
हा पंचमवेद तुका म्हणे होय मनाशी संवाद साधत मनाला प्रसन्न करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे करत आहे. वैराग्यमूर्ती तुकोबांनी छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा परत पाठवला होता. कारण शब्दांचीच रत्ने आणि शस्त्रे देऊन तुकोबांनी मराठीला समृद्ध आणि श्रीमंत केले होते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।
संत तुकाराम हा सांस्कृतिक टेहाळणीसाठी, साहित्यिकांसाठी, विचारवंतांसाठी, शैक्षणिक वाटचालीसाठी किंबहुना प्रत्येकासाठी मोक्याचा बुरूज आहे. हे खरे असले तरी हा बुरूज केवळ मराठी संस्कृतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तुकोबांनी अवघे आकाश कवेत घेतले आहे. कर्नाटकात, तामिळनाडूत होत असणारी कीर्तने, साजरी होणारी तुकारामबीज, आंध्र प्रदेश, प. बंगाल, गुजरात या राज्यांतील तुकोबांच्या अभंगांनी झपाटून गेलेले तरुण म्हणजे त्यांच्या जगद्गुरू या ब्रह्मपदापेक्षा मोठ्या असलेल्या पदाचे द्योतक आहे. उत्पन्नाचे नवे विक्रम स्थापन करणारा “प्रभात’चा 1936 मध्ये प्रदर्शित झालेला “संत तुकाराम’ हा चित्रपट अभूतपूर्व यश संपादन करणारा पहिला चित्रपट होता.
व्हेनिस येथे 1937 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “संत तुकाराम’ या चित्रपटाने जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी या त्यांच्या कार्यक्रमात तुकोबांचा प्रसिद्ध “सुंदर ते ध्यान’ हा अभंग आवर्जून गात असत. इतर देशांमध्ये देखील तुकोबारायांचे विविध अभंग गायले जातात आणि आंतरराष्ट्रीय नृत्यांगना त्या अभंगावर नृत्यही सादर करतात. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे हे संत तुकाराम महाराजांना प्रेरणास्रोत मानत. त्यांनी तर तुकोबांचे अप्रतिम चित्र रेखाटले होते. रवींद्रनाथ टागोर हेही तुकोबांच्या प्रभावापासून दूर राहू शकले नाही. त्यांनी तुकोबांचे 12 अभंग अनुवादित केले होते. महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात असताना तुकोबांचे अभंग गुजराथीत आणि इंग्रजीत अनुवादीत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या “मूकनायक’ या पाक्षिकात शीर्षकाखाली तुकोबांच्या
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण ।
सार्थक लाजोन नव्हे हित ।।
या अभंगाचा प्रभावीपणे उल्लेख करत.