-प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ
वसंत तेथें वनें । वन तेथे तेथ सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगाचीं ।।
गुरू तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ।।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची आपल्या श्रीगुरू निवृत्तीनाथ यांच्यावर अतिशय नितांत अशी गाढ श्रद्धा होती. गुरूपणावर दृढ विश्वास होता. ज्यावेळी ऋतूंचा राजा वसंत येतो त्याबरोबर वृक्ष बहरतात, सुगंध बहरतो… त्याप्रमाणे जेथे गुरू महाराज येतात तेथे त्यांच्याबरोबर ज्ञानही असते.
त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या शिष्य, अनुयायी वर्गाला ज्ञान प्राप्त होऊन त्यांना ज्ञानदृष्टी मिळते आणि शिष्याचे जीवन परिपूर्ण होते. कारण गुरू हा संत कुळाचा राजा असून तो प्राणाचा विसावा आहे.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरूने माझ्यावर कृपा करून आशीर्वाद दिला व माझा अंगीकार केला. गुरूपासून परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी अशी धारणा असावी लागते.