-ह. भ. प. जगन्नाथ गर्जे
ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।
ज्ञानोबारायांच्या अवतार कार्यातील समाजाभिमुख घटक म्हणजे “ज्ञानेश्वरी’ “मेळविली मांदी वैष्णवांची’ हे त्यांचे अवतार कार्य. या विश्वातील सर्व भेद माऊलींनी नष्ट केले. माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दोन ओव्यांमध्ये सर्व भेद नाहीसे करतात.
जगाचे मूळ कारण असलेला परमात्मा स्मृतीने त्याला ओम हे नाव दिले. ज्याचे प्रतिपादन स्वत: वेदाने केलेले आहे. इथे देव आणि जीवातील भेद नाहीसा केला. तसेच “देवा तुची गणेशु।’ या ठिकाणी देवादेवातील भेद नाहीसा केला. त्याला जाणून घ्यायचं म्हटले तर तो स्वसंवेद्य आहे. त्याच्या शिवाय त्याला जाणता येत नाही. जगाचा आद्य व आत्मस्वरूप असलेला परमात्मा त्याला गणेश असे संबोधून पहिल्या अध्यायाचे एकोणिसाव्या ओवीत ओम कारामध्ये बसवलेले आहे.
अकार चरणयुगल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारो।।