– अजय बाविस्कर
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस संत कबीर यांची जयंती म्हणून उत्तर भारतात विशेषतः वाराणसी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यांचा जन्म सुमारे 14-15 शताब्दीमध्ये उत्तरप्रदेशातील काशी (वाराणशी) येथे झाला होता.
प्रेम जगा वैविरहको, विरह जगावै पीउ ।
पीउ जगा वैजीव को, जोइ पीउ सोई जीउ ।।
प्रा. महावीर सरन जैन यांच्या मते, कबिरांची साधनाच मुळी या प्रेमतत्त्वापासून सुरू होते. हे प्रेमतत्त्व कुठल्याही ग्रंथातून मिळणार नाही तर ते फक्त आणि फक्त आचरणातून प्राप्त होते. इतके उदात्त, गहिरे, गाढ प्रेम करा की ते प्रेमच तुमच्यासाठी परमेश्वर होऊन जाईल आणि या परमेश्वराला प्राप्त करण्याची उत्कंठा तुम्हाला वैराग्य प्राप्त करून देईल.
त्या परमात्म्याच्या विरहाच्या भावांमध्ये जे ध्यान-समाधी लागेल त्या अवस्थेत जे अमृत प्राप्त होईल तोच तुमच्या अंतर्मनातील जीवाला जागृत करेल आणि या जागृत झालेला जीव संपूर्ण विश्वावर प्रेमाचाच वर्षाव करेल. या विश्वातील प्रत्येक जीवावर तुम्ही प्रेम कराल. संपूर्ण अहंकार, राग, द्वेष नाहीसा होऊन जाईल आणि संपूर्ण विश्व अमृतमय होऊन जाईल. आपले आपल्या घरावर, घरातील व्यक्तीवर प्रेम असतेच पण जेव्हा संपूर्ण विश्वच हे आपले घर झाले तर कबिरांना अपेक्षित प्रेमाचा उदय होईल.
“हे विश्वची माझे घर’ या ज्ञानदेवांच्या “ज्ञानेश्वरी’तील ओवीची आठवण येथे होते. तर हाच प्रेमभाव ज्ञानदेवांच्या “अनुभवामृत’ या ग्रंथावरील आपल्या भाष्यात या ग्रंथाचे जे वेगळेवेगळे प्रकरण स्वामी उमनंदांनी केली आहेत त्यातील “प्रीयुची झाला प्राणेश्वरी’ या प्रकरणात हाच प्रेमाचा महाभाव सापडतो.
कबीर बादल प्रेम का, हम पर बरष्या आइ।
अंतरि भीगी आत्मां, हरीभई बनराइ।।
या आपल्या दोह्यामध्ये संत कबीर प्रेमाचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, माझ्या जीवनात प्रेमाचा वर्षाव झाला, या प्रेमाच्या वर्षावात माझा अंतरीचा आत्मा पूर्ण भिजला की ज्यामुळे माझी आंतरशक्ती जागृत होऊन माझे जीवन हरिमय झाले, बहरून आले, समृद्ध झाले.
पोथी पढ़िप ढ़िज गमुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।
या जगात जर विद्वान व्हायचे असेल तर संत कबीर म्हणतात, मोठमोठे ग्रंथ वाचून कोणी मोठे होणार नाही, पण जर अंगी विनम्रता, सर्वांशी प्रेमाचे नाते जोडता आले आणि अडीच अक्षरी प्रेम या शब्दाचे खरे ज्ञान प्राप्त झाले तर तो खरा विद्वान होईल.
संत कबीर उदरनिर्वाहासाठी विणकराचे काम करत असत. त्यांनी आपल्या शेवटच्या आचरणातून एक खूप मोठी शिकवण दिली. मनुष्याला जी अंतिम गती मिळते ती त्याच्या कर्मानुसारच मिळते न की कुठल्याही स्थानानुसार. स्वर्गनरकप्राप्ती ही श्रद्धा खोटी ठरवण्यासाठीच जणू संत कबीर यांनी आपला अंतिम काळ मगहर येथे व्यतीत केला व तिथेच ते अनंतात विलीन झाले.
काही मोजकेच संत असे आहेत की ज्यांच्या संप्रदायात वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांचे अनुयायी आहेत. त्यातील संत कबीर हे एक आहेत. हिंदू, मुस्लीम व शीख या तीनही धर्मात त्यांना एक उच्चस्थान आहे. साहित्यामुळे अजरामर झालेल्या या महान प्रेमयोगी संतास प्रणाम.