-अजय बाविस्कर
आज 3 डिसेंबर, संत बहिणाबाई यांचा 69वा स्मृतिदिन. 24 ऑगस्ट 1880 साली असोदा या जळगाव जिल्ह्याजवळील खेडेगावात जन्मलेल्या बहिणाबाई 3 डिसेंबर 1951 ला या जगाचा निरोप घेऊन गेल्या. पण त्यानंतर एका वर्षाच्या आतच म्हणजे 1952 साली साहित्य क्षेत्रात एक कवयित्री म्हणून जन्माला आल्या.
हा साहित्यिक पुनर्जन्म, बहिणाबाईंचा मुलगा सोपानदेव व त्यांचा मामेभाऊ पितांबर हे ज्यांना गुरुस्थानी मानत होते ते म्हणजे आचार्य अत्रे यांच्या परिश्रमातून झाला. 1952 साली बहिणाबाईंचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. त्याचे नाव “धरतीच्या अरशामधी सरग (स्वर्ग)’ यात त्यांच्या जवळजवळ 35 कवितांचा अंतर्भाव होता. जेव्हा आचार्य अत्रे यांनी सोपानदेवांनी दाखवलेली हस्तलिखते पाहिली तेव्हा ते म्हणाले की, हे तर बावनकशी सोने आहे आणि हे जर आपण लपवून ठेवले तर आपण महाराष्ट्राचे गुन्हेगार ठरू. अत्रे यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला लाभली होती.
“जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. बहिणाबाई यांच्या 66व्या स्मृतिदिनानिमित्त बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार’ हा ज्यांना देण्यात आला ते संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी असे प्रतिपादीत केले की अक्षरांची ओळख नसतानाही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी कवितेतून “अक्षर वाङ्मय’ निर्माण केले.’
बहिणाबाईंच्या कवितेतून डोकावणारा निसर्ग पाहिल्यानंतर त्यांच्या एक काव्यरचनेच्या इंग्रजी अनुवादाला “फ्रेग्नन्स ऑफ द अर्थ’ असं सार्थ नाव ठेवण्याचा मोह अनुवादकाला झाला.
त्यांच्या रचनेचे, काव्याचे विषय संसार, शेतीकाम किंवा कृषीजीवन, सण- पोळा, गुढीपाडवा असे वेगवेगळे होते तर तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजून सांगतिले. माणसाचा जन्म, जीवन, मृत्यू, पोट भरण्यासाठी करावी लागलेल्या कष्टाचा सामनाही त्यांनी आपल्या काव्यातून मांडले. मनुष्य स्वभावावर परखड शब्दात मत मांडले. त्यांच्या “कशाले काय म्हणू नये’ या रचनेतून दिसून येते.
जीले नाही फुटे पान्हा
तिले माय म्हनू नही
इके पोटच्या पोरीला
त्याला बाप म्हणू नही।
आखडला दानासाठी
त्याले हात म्हणू नही
धावा ऐकून आडला
त्याले पाय म्हनू नही।
वयाच्या केवळ 30 व्या वर्षी आलेल्या वैधव्याला सामोरे जाताना त्यांची मानसिकस्थिती कशी असेल त्याचे भेदक वर्णन त्यांनी त्यांच्या एका रचनेत केलेले आहे. त्याचबरोबर पदरी असलेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी आपले दुःख बाजूला सारून आपल्या दोन मुलांसाठी जीवनाशी दोन हात करण्यासाठी कंबरपण कसली. प्रत्येकाच्या हातावर धनरेषा असते पण वैधव्य प्राप्त झालेल्या बहिणाबाई त्या अनुषंगाने देवाला म्हणतात की
देवा तुझ्याबी घराचा
झरा धनाचा आटला
धनरेखेच्या चऱ्हान
तय हात रे फाटला।
बापा नको मारू थापा
असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब
तय हाताच्या रेघोट्या।
राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मागणं
त्यात आल रे नशीब
काय सांगे पंनचांग।
योगी आणि सासुरवाशीण या काव्यातून बहिणाबाईंनी जो संवाद साधला आहे तो तर वाचून प्रत्येक स्त्रीला जणू असे वाटेल की तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा चराचरात भरलेला परमेश्वर जर एक सहस्त्रौंश असेल तर उरलेला सर्व परमेश्वर स्त्रीच्या माहेरामध्ये सामावलेला आहे. योगीचा सासुरवाशीणीला प्रश्न आहे की-
माझं माहेर माहेर
गाण तुझ्या सदा ओठी
मग माहेरून आली
सासरी कशासाठी?
याच्यावर त्या योगीला बहिणाबाईंच्या सासुरवाशिणीने जे उत्तर दिले ते असे-
दे रे दे रे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते।
आपल्या जन्मदाई मातेविषयी एका कवितेत फार सुंदर वर्णन केले आहे. सुरुवातीला तिचा स्वभाव विशेष सांगताना बहिणाबाई म्हणतात की, तिचा स्वभाव म्हणजे खडीसाखर जणू.
आपल्या आईला आंब्याच्या झाडाची जणू सावली आहे ही उपमा तर अप्रतिम आहे त्यात खूप मोठे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आहे त्यासाठी फार मार्मिकरित्या सासर व माहेरचा उल्लेख केला आहे. झाडाचा गुणधर्म जसा सावली देणे मग त्या सावलीचा उपभोग घेणारा दुष्ट असो व सुष्ट असो, जवळचा असो वा दूरचा सावलीचा एकच गुण आहे की आलेल्या वाटसरूला सावली देणे, थंडावा देणे, त्याचा थकवा दूर करणे.
तसं रुप बी घडलं
जशी बोरतली आळी
आंन कमामंधी बाकी
त्याले कुठे तोड नाही।
असो सासरी माहेरी
जशी आंब्याची सावली
झिजे अवघ्यांसाठी
अशी लाखात माऊली।
“अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर
आधी हाताले चटके तवा मिळतं भाकर’ व
“मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला तरी येतं पिकावर’आणि “अरे खोप्यामधी खोपा सुगरिणीचा चांगला बघा पिलासाठी जीव तिनं झाडाले टांगला’ ही तीन काव्य जगप्रसिद्ध आहेत. असे हे खानदेशातील खमंग भाजलेल्या वांग्याच्या भरतासारखे लुसलुशीत मध्येच झणझणीत असलेलं बहिणाबाईंच्या साहित्याची मेजवानी आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल सोपानदेव व आचार्य अत्रे यांना धन्यवाद व संत बहिणाबाई यांना प्रणाम.