-अनिल विद्याधर
करोना महामारीने अनेक दिग्गजांना आपल्यापासून हिरावून नेले आहे. दुर्दैवाने या यादीत भारतीय सिनेगायन क्षेत्रातील प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचेही नाव आता सामील झाले आहे.
दक्षिण भारतात जन्मलेल्या एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी अनेक भाषांमध्ये गीते गायली; परंतु ते खुल्या दिलाने सांगत असत की मला गीतगायनाची प्रेरणा हिंदी गाण्यांनी दिली. आजच्या काळातील हिंदी चित्रपटांतील गाण्यांमध्ये “अवीट’ आणि “मधुर’ गीतांचा भिंग घेऊन शोध घ्यावा लागतो. त्यामुळेच केवळ जुनी पिढीच नव्हे तर आजची पिढीही जुन्या आणि नव्वदीच्या दशकातील गाण्यांमध्ये रमताना दिसते.
नव्वदीच्या काळातील कुमार सानू, उदित नारायण, विनोद राठोड यांबरोबरीने एक वेगळा, कर्णमधुर आणि मनाला मोहिनी घालणारा आवाज म्हणजे एसपींचा. “एक दुजे के लिये’, “मैने प्यार किया’, “हम आपके है कौन’, “लव’, “सागर’, “साजन’, “रोजा’ आदी चित्रपटांमधील एसपींची रोमॅंटिक गाणी ऐकताना आजही भान हरपायला होतं. तब्बल तीन दशकं त्यांची गाणी लाखो रसिकांच्या मनःपटलावर रुंजी घालत राहिली, यातूनच त्यांचं वेगळेपण दिसून येतं.
एसपींचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोरमधला. त्यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचा वारसा
मिळाला. संगीताच्या नोटेशन्स वाचून ते त्याचे धडे गिरवायला लागले. गायनाची विलक्षण आवड असणाऱ्या एसपींनी इंजिनिअरींग करतानाही महाविद्यालयातील तरुण-तरुणींवर आपल्या जादुई आवाजाची मोहिनी घातली. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यामुळे इंजिनिअर बनण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. यानंतर त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आणि अवघ्या देशाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करण्याची किमया साधली.
“श्री श्री मर्यादा रामण्णा’ या तेलगू चित्रपटाद्वारे एसपींनी पहिल्यांदा मोठ्या पडद्यासाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर खरोखरीच त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंत भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायलेल्या गीतांची संख्या 40 हजारांहून अधिक आहे. एसपी मोहम्मद रफीचे मोठे फॅन होते. सोनू निगमसोबतच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते की, मी सायकलने कॉलेजला जायचो. त्यावेळी “दिवाना हुआ मौसम’ हे रफींचे गाणे ऐकायला मिळायचे. कित्येकदा मी ते गाणे ऐकण्यासाठी वाटेत थांबायचो.’
एसपींनी हिंदीबरोबरच तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतूनही पार्श्वगायन केले. एमजीआर, कमल हसन, रजनीकांतपासून सलमान खान, शाहरुख खानपर्यंतच्या सुपरस्टार्ससाठी एसपींनी गाणी म्हटली. विशेष म्हणजे, या सुपरस्टार कलाकारांना त्यांचा आवाज इतक्या अप्रतिमरित्या सूट व्हायचा की, जणू तेच गाताहेत की काय असे वाटायचे. कोणाही गायकाची ही खासियत असते.
एसपींची ओळख अन्य एका कारणासाठी आहे ती म्हणजे त्यांनी बारा तासांमध्ये 21 कन्नड गीते म्हटली होती. संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी ही गाणी त्यांनी गायिली. गीतगायनाच्या क्षेत्रात हा एक विक्रम मानला जातो. याखेरीज एका दिवसांत 16 हिंदी गाणी गाण्याचाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते की, आता मी गायलेल्या गाण्यांची गणती करणे सोडून दिले आहे. संगीत, गायन, अभिनयाचे क्षेत्र असे आहे की, इथे फक्त अस्सलपणाच टिकतो. मायबाप रसिकांवर जो मोहिनी घालतो त्यालाच वारंवार संधी दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात कितीही भाऊगर्दी झाली तरी त्यामध्ये टॅलेंट असणारेच चमकत राहतात. त्यातही काहींची मोहिनी ही तात्कालिक स्वरूपाची असते; परंतु एसपी त्याला अपवाद होते. त्यांच्या पार्श्वगायनाच्या आठवणींना आजही लाखो रसिक उजाळा देत असतात, यातून त्यांच्या गाण्यांचा दर्जा आणि गोडवा किती विलक्षण होता हे लक्षात येते.
हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले ते 1981 च्या “एक दुजे के लिये’ या चित्रपटातून. त्यावेळी आजच्यासारखी संपर्कमाध्यमे, सोशल मीडिया, इंटरनेट नव्हते. रेडिओ, दूरदर्शन, कॅसेटस्चा तो काळ होता. त्या काळात रेडिओवर त्यांची गाणी ऐकण्यासाठी लोक अक्षरशः आतूर असायचे. “एक दुजे के लिये’ या चित्रपटातून कमल हसन आणि रती अग्निहोत्री या कलाकारांनीही आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. त्याला चित्रपटाचे कथानक, अभिनय याबरोबरच त्यातील अफलातून गाणीही कारणीभूत होती. “तेरे मेरे बीच में’, “हम बने तुम बने इक दुजे के लिये’, “मेरे जीवनसाथी’ यांसारख्या गाण्यांतून एसपींनी आपल्या गायनाचे वेगळेपण दाखवून दिले.
एसपींच्या रोमॅंटिक गाण्यांमधील हरकती, आवाजातील चढउतार हे रसिकांना प्रचंड भावले. “मैने प्यार किया’ या चित्रपटामध्ये त्यांनी साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत गाणी गायिली. हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही लतादीदींबरोबर गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा ते काहीसे तणावात होते. अखेर दीदींनी त्यांचा ताण दूर केला आणि पुढे जाऊन या जोडीने गायलेली या चित्रपटातील गीते अक्षरशः अजरामर झाली. रोमॅंटिक गाण्यांबरोबरच एसपींनी गायलेली सॅड सॉंग्ज किंवा विरहगीतेही रसिकांना विशेष आवडली.
रमेश सिप्पी यांच्या “सागर’मधील “सच मेरे यार है…’ हे गाणे ऐकताना आजही कित्येकांचे डोळे पाणावतात. याच चित्रपटातील “ओ मारिया’ हे गाणेही एसपींनीच गायले; पण त्याचा लहेजा आणि धाटणी पूर्णपणे वेगळी होती.सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अभिनित “साजन’ हा नव्वदीच्या दशकात प्रचंड गाजलेला चित्रपट. हा चित्रपट जितका गाजला तितकीच यातील “तुमसे मिलने की तमन्ना है…’ सारखी गाणीही गाजली.
बॉलीवूड इंडस्ट्रीत वर्चस्व असलेल्या खान त्रयींमधील एक असणाऱ्या सलमान खानला एसपींच्या गीतांची अमूल्य साथ लाभली. “लव’ चित्रपटातील “साथियॉं… तुने क्या किया’ असो, “हम आपके है कौन’मधील “पहला पहला प्यार है’ असो अशा काही कर्णमधुर आणि सदोदित सुश्राव्य ठरणाऱ्या गाण्यांशी सलमानबरोबरच एसपींच्या आवाजाचीही आठवण जोडली गेलेली आहे. ती कधीच पुसता येणार नाही. “रोजा’ चित्रपटातील एसपींनी गायलेली गीते आजही ऐकताना मन एका वेगळ्या दुनियेत जाते.
असा हा स्वरवैविध्याचा बादशहा करोनाने आपल्यापासून हिरावून घेतला आहे. संगीतक्षेत्रातील बप्पी लहरी, ललित पंडित, रामलक्ष्मण अशा अनेकांनी त्यांच्या स्वरांविषयी व्यक्त केलेल्या भावनातून एसपींची महत्ता लक्षात येते. कलांना कोणतीच सीमा बंधनात बांधून ठेवू शकत नाही, असे म्हणतात. एसपी बालसुब्रह्मण्यम हे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल. दक्षिणेकडील गायक अनेकदा हिंदी शब्दरचनांचे स्पष्टोच्चार करत नाहीत, असे सांगितले जाते. पण एसपींच्या गाण्यांमध्ये तसा लवलेशही दिसून आला नाही. आज बॉलीवूडमध्ये कर्णकर्कश किंवा अनावश्यक चढउतार घेणाऱ्या गायकांची चलती दिसून येते. आजच्या पिढीला ही गीते काही काळासाठी आकर्षित करतात; पण काही दिवसांतच ती विस्मरणात जातात. पण ही “जनरेशन’ही जेव्हा एसपींची गीते ऐकते तेव्हा रममाण होऊन जाते.
पद्मश्री, पद्मभूषण, फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी एसपींना गौरवण्यात आले. परंतु रसिकांना त्यांनी दिलेला आनंद हा या पुरस्कारांहून कितीतरी मोठा आहे. असा हा सुरेल, अवीट आणि भारदस्त स्वरसम्राट आज अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. पण आपल्या स्वरांमधून तो एखाद्या ध्रुवताऱ्यासारखा रसिकांच्या मनात अढळ स्थान कायम राखेल यात शंका नाही.