भारत आजमितीला अनेक आघाड्यांवर माहिती युद्धाला तोंड देतो आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तान आपल्याविरुद्ध नेहमीच गरळ ओकत असतो. चीनही उत्तर सीमा आणि नक्षलबहुल भागांमधील वास्तव विरोधी बातम्या देत असतो.
पाकिस्तानचेच उदाहरण पाहिले तर हे लक्षात येते की, दोन-अडीचशे जिहादी आतंकी काश्मीरमध्ये आज मुक्त संचार करताहेत, हा राग भारतीय प्रसारमाध्यमे मागील अनेक वर्षांपासून आळवताहेत. दुसरीकडे, चालू वर्षात आम्ही 150-200 जिहादी मारले आहेत हे काश्मीरमधील सेना उपमुख्यालय दरवर्षी जाहीर करतात. पण नवलाची गोष्ट म्हणजे, माध्यमातील जिहादी आतंक्यांची संख्या पुढील वर्षातही दोन-अडीचशेच असते. वर्षानुवर्षे ती तेवढीच आहे. याचा अन्वयार्थ असा की, आम्ही जिहादी दहशतवादाला न मारता फक्त दहशतवाद्यांनाच मारतो आहोत.
जिहादी दहशतवादाचे आणि फुटीरतेचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या श्रीनगर खोऱ्यातील बहुतांश तरुण, देशातील इतर तरुणांप्रमाणेच मोबाइल ऍडिक्ट आहेत. फरक इतकाच की त्यांच्या स्मार्टफोनमधील मजकूर धक्कादायक असतो. खोऱ्याचे कट्टरपंथीकरण प्रचंड वेगाने होत आहे. फक्त खोऱ्यातच हजारो ठिकाणी तरुणांच ब्रेन वॉशिंग केले जाते. तेथील बहुतांश प्रशिक्षक काश्मिरी नसून, उत्तर प्रदेशातील जमात ए इस्लामी या देवबंद संस्थेचे पाईक आहेत. ते या तरुणांच्या मनात जिहादी महिम्याचे धार्मिक विष भरताहेत. या सर्वांविरुद्ध ठोस रणनीती आपल्याकडे नाही. व्हॉट्सऍप ग्रुपचा वापर, सुरक्षादलांवर दगडफेक करणाऱ्यांना गोळा करण्यासाठीच केला जात नाही तर जिहाद्यांना, सुरक्षादलांच्या हालचालींबद्दल माहिती देण्यासाठीही केला जातो. सुरक्षादलांच्या कॅंप्सजवळ घुटमळणारे-वॉच ठेवणारे तरुण, छावणीतून बाहेर जाणाऱ्या ताफ्यातील वाहनांची संख्या, जाण्याची दिशा, जवानांची संख्या लगेच जिहाद्यांना याच स्मार्टफोनवर देतात.
काश्मीरमध्ये हजारो लोकांचे फेसबुक पेजेस आणि ट्विटर हॅन्डल्स इंटरनेटवर फिरताहेत. यातील असंख्य खाती खोटी आहेत. या फेक अकाउंट्सच्या माध्यमातून आयएसआय काश्मिरी तरुणाईच्या मनात विष कालवणारे ब्लॉग्ज, व्हिडियोज आणि साहित्य प्रसारित करते. उच्च प्रतीचे तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि ध्वनीप्रणाली असणारी ही सर्व प्रक्रिया पाकिस्तानी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स या लष्करी संघटनेचे अपत्य आहे. हा स्मार्टफोन आणि संगणकांच्या माध्यमातून चालवला जाणारा एक प्रकारचा ई-जिहाद आहे. पाकिस्तानी सशस्त्र दलांची जनसंपर्क शाखा या ई-जिहादची जननी आहे. त्यांनी तयार केलेली विषारी सामग्री काश्मिरी तरुणांच्या स्मार्टफोनवर टाकून हे ब्रेन वॉशिंग होत आहे.
काश्मीरमधील कार्यरत जिहाद्यांमध्ये अनेक पाकिस्तानी, अफगाण, सुदानी, येमेनी आणि इतर विदेशी आतंकवादी आहेत. जात्या दिवसागणिक, विदेशी जिहाद्यांची संख्या कमी होऊन आता जवळपास नगण्यच आहे. एखाद-दुसरा विदेशी आतंकवादी जिहादी भारतात घुसण्यात यशस्वी होत असेलही; पण आजमितीला काश्मीरमध्ये स्थानिक आतंकवादीच मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. भारतात जिहादी आतंकवाद निर्यात करण्याची गरज नाही याची खात्री पाकिस्तानने केली आहे. जिहादच्या नावाखाली काश्मिरी तरुणाईला कट्टरपंथी बनवण्यात येत आहे.
असे तरुण जिहादी गटांत सामील होतात, हाती हत्यारे घेऊन त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात येतात, त्यांना हिरो बनवले जाते. सुरक्षादलांच्या हाती ती छायाचित्र लागली की ते तरुण चिन्हांकित होतात आणि सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत असे तरुण मारले जातात. काश्मीरमध्ये जिहाद्यांचा प्रवाह अखंड चालण्याची ही सुसूत्र प्रक्रिया आहे. असे स्थानिक जिहादी, सभोवतालच्या परिसरात मिसळून जाण्यात सक्षम असल्यामुळे पाकिस्तान याबाबत आपले हात झाडतो. एवढेच नव्हे तर तो काश्मीरमधील स्वातंत्र्य संग्राम स्वदेशी असल्याचा दावा करतो.
उत्तर सीमेवरील घुसखोरी कारवाया आणि त्याच्या सक्रिय समर्थनाने चालणाऱ्या मध्य भारतातील नक्षली आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अलगाववादी कारवायांसाठी चीन अशाच प्रकारच्या कार्यप्रणालीचा अंगीकार करतो. चीनने लडाखमधे मुसंडी मारली आहे. अरुणाचल प्रदेश आमचाच असे चीनचे म्हणणं आहे. शत्रू जमिनीवर नसून मनात असतो म्हणजे काय याचे आकलन आपल्याला झालेले नाही. आपल्याला भेडसावणाऱ्या चीन व पाकिस्तान संबंधी बहुतांश समस्यांना सोशल मीडिया कारणीभूत आहे. हा अपप्रचाराचा “रोड मॅप आहे’ ज्याचा मुकाबला आपण खूप आधीपासून करायला हवा होता. काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना मारून तेथील प्रश्न सुटणार नाहीत. स्थानिकांसोबत सगळा व्यवहार करून लडाख अरुणाचलमधील समस्याही सुटणार नाही. हे आता केवळ सामरिक आणि डावपेचात्मक युद्ध राहिले नसून माहिती युद्धात परिवर्तित झाले आहे.
त्यामुळेच येत्या काळासाठी आपल्यालाही एक “रोड मॅप’ बनवावा लागेल. “इन्फर्मेशन वॉर’ खेळण्यासाठी सरकारला सर्वप्रथम, राजधानी दिल्लीत, या कामासाठी योग्य निवडक लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात, एक वेगळी सुरक्षित, गुप्त यंत्रणा उभारावी लागेल. हे इन्फर्मेशन वॉर सेंटर (आयडब्ल्यूसी) केवळ पीएमओला उत्तर देण्यास जबाबदार असेल. याचा सर्वोच्च व्यवस्थापक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांखाली कार्यरत असेल. यांच्या हाताखाली संगणक व संभाषण प्रवीण, हुशार तरुण तरुणींच्या अनेक टीम्स असतील. यात लेखक (कन्टेन्ट रायटर्स), व्हिडिओग्राफर, विशेष प्रभाव तज्ज्ञ, व्हिडिओ संपादक, हॅकर्स, सोशल मीडिया तज्ज्ञ, संशोधक विद्वान, भाषाशास्त्रज्ञ, गीतकार, संगीतकार आणि नकलाकार असतील.
यांच्याकडे आवश्यकतेनुसार रेकॉर्डिंग स्टुडिओ, सर्व्हर रूम, आयटी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, हायस्पीड इंटरनेट आणि सामग्री निर्मिती आणि सोशल मीडियाशी संबंधित सर्व उपकरणेही देण्यात येतील. हे सर्व भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असणारे, चीनविरुद्ध काम करायला इच्छुक लडाखी, तिबेटियन, अरुणाचली तरुण तरुणी आणि पाकिस्तान विरुद्ध काम करण्यास इच्छुक काश्मिरी तरुण तरुणी असतील. हे सर्व लोक हजारो-लाखो ट्विटर हॅंडल, फेसबुक प्रोफाइल, इन्स्टाग्राम खाती, ब्लॉग, वेबसाइट्स आणि व्हॉट्सऍप ग्रुप्स तयार करून अपप्रचार विरोधातील भारतीय भूमिका उजागर करतील. तसेच या दोन्हींमध्ये झालेल्या घटनांचे भारत धार्जिणे वर्णन तेथील लोकांपर्यंत पोचवतील. चिनी-पाकिस्तानी अपप्रचाराचा मुकाबला करण्यासाठी साधननिर्मिती आणि स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर चिनी, काश्मिरी व त्यांना धार्जिण्या माध्यमांना योग्य तोंड देण्यासाठी, त्यांच्या वैधिक व्यवस्थापनासाठी या सर्वांची नितांत गरज आहे.
“इन्फर्मेशन वॉर’ ही नवीन संकल्पना आहे. भारताला यातील प्रावीण्याची नितांत आवश्यकता आहे. कुठलीही विषारी विचारसरणी कधीच केवळ हत्यारांनी मारली जाऊ शकत नाही. उलटपक्षी, एक कल्पनाच दुसऱ्या विषारी कल्पनेला मारू शकते. चीन व पाकिस्तानने भारतविरोधी माहिती युद्ध छेडले आहे. आपण इन्फर्मेशन वॉरसाठी सज्ज झालो तर आणि तरच,पाकिस्तानमधील कट्टर जिहादी आतंकवादी आणि उत्तर सीमेवर आक्रमक आविर्भावात असलेला आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अलगाववादी व मध्य भारतातील नक्षल समर्थक असणाऱ्या कपटी चीनच्या कुटील आकांक्षा व कारवायांना आळा घालता येईल. पाकिस्तान व चीन धार्जिणी अभद्र सांगडीला नेस्तनाबूत करण्यासाठी इन्फर्मेशन वॉर फेयरची कास धरण्याशिवाय कोणताही पर्याय भारताकडे नाही.