मूळ भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याची बातमी असंख्य भारतीयांना सुखावून गेली आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले त्या देशाची सत्ताच आता ऋषी सुनक नावाच्या भारतीय वंशाच्या हातात गेल्याने भारतीयांना आनंद होणे अगदीच स्वाभाविक आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील सामाजिक संदर्भ लक्षात घेतले तर ब्रिटिश समाजातील अनेकांनी भारताला कायमच कमी लेखले आहे हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे एक भारतीय वंशाचा माणूस या देशाच्या सर्वोच्च पदावर जाणे हा भारताला मिळालेला काव्यगत न्याय आहे, अशीही अनेकांची भावना आहे. या अनुषंगाने अनेकांच्या जुन्या संदर्भाच्या आठवणीही जाग्या झाल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटनमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा अशा कारणाने विरोध होता की, भारतीयांना हा महाकाय देश चालवणे जमणार नाही. लोकशाही मार्गाने हा देश चालवण्याचा मनोदय तत्कालीन भारतीय नेत्यांनी व्यक्त केला होता.
संसदीय लोकशाही भारताने स्वीकारण्याचेही मान्य झाले होते. पण लोकशाही कशाशी खातात हे बहुसंख्य भारतीयांना माहिती नाही आणि संसदीय लोकशाहींची पद्धत त्यांना झेपणारी नाही वगैरे मतेही त्या काळात व्यक्त केली गेली होती. तथापि भारताने आपल्या 75 वर्षांच्या वाटचालीत हे सारे समज खोटे ठरवले आहेत. लोकशाही मूल्यांची जपणूक ही भारताची जगातील ओळख बनली आहे. आता तर भारतीय वंशाचाच माणूस ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर पोहोचणे या घटनेलाही मोठे मोल आहे. ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असण्याचे जे एक कनेक्शन आहे त्याहीपेक्षा त्यांचे भारताशी असलेले अधिक जवळचे कनेक्शन म्हणजे ते अस्सल भारतीय असलेले नारायण मूर्तींचे जावई आहेत. म्हणूनच त्यांची पंतप्रधानपदी निवड होण्याचा एक आगळाच आनंद भारतात व्यक्त होताना दिसतो आहे. गेल्या काही काळात ब्रिटिश संसदीय व्यवस्थेत तेथील मूळ भारतीय वंशाच्या अनेकांनी आपले आगळे स्थान निर्माण केले आहे.
ब्रिटनच्या अर्थखात्याचा कारभार भारतीय व्यक्तीच्या हाती गेला होता त्याच वेळी भारतीयांचे तेथील महत्त्व ठसठसशीत पद्धतीने समोर आले होते. ऋषी सुनक यांच्या पंतप्रधानपदावरील निवडीने भारतीयांच्या कर्तबगारीवर आणि त्यांच्या क्षमतेवर पूर्ण शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात हे जरी खरे असले तरी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड होण्याने भारताला नेमका काय लाभ होणार आहे, हाही एक संशोधनाचाच विषय ठरणार आहे. कारण भारत आता मजबूत आर्थिक स्थितीत आहे. त्यामुळे आर्थिक आधारावर भारताला सध्या ब्रिटनचा फार उपयोग नाही.
मुळात ब्रिटनचीच आर्थिक स्थिती आता अधिकच नाजूक बनली आहे. ब्रिटन म्हणजे काही अमेरिका नव्हे. त्यामुळे ऋषी सुनक यांच्याकडे ब्रिटनची सूत्रे जाण्याने भारताच्या पदरात फार काही पडेल अशी शक्यता नाही, किंबहुना तशी अपेक्षाही भारताला नाही. फक्त एकच आहे की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रिटन हा अजूनही एक वजनदार देश मानला जातो. त्यामुळे अशा व्यासपीठांवर ब्रिटनचा एखाद्या देशाला पाठिंबा किंवा समर्थन असणे ही एक जमेची बाजू मानली जाते. तेवढ्यापुरता त्यांचा भारताला लाभ होऊ शकतो. पण आपण भारतीय वंशाचे असल्याने, भारताच्या बाजूने पक्षपाती आहोत असा समज होऊ नये म्हणून ऋषी सुनक अधिकच दक्षता घेण्याची शक्यता असल्याने काही वेळा भारतासाठी त्यांची निवड नुकसानदायक होणार नाही ना ही चिंताही सतावते आहे. सुनक यांचे राजकीय आयुष्य दीर्घ अनुभवाचे नाही, त्यांचे वयही जेमतेम 42 वर्षांचे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेली ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. सन 2015 साली ते ब्रिटिश संसदेचे पहिल्यांदा खासदार बनले. त्या अर्थाने त्यांचे राजकीय वय जेमतेम सात-आठ वर्षांचेच आहे. तरीही बहुतांशी ब्रिटिश खासदारांनी त्यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. याचा अर्थ तेथील राजकीय सिस्टीममध्ये सुनक यांनी अल्पावधीत मोठा विश्वास कमावला आहे, असा होतो.
ब्रिटनमध्ये अलीकडच्या काळात काही वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. आधीच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना केवळ 44 दिवसांच्या अवधीतच पायउतार व्हावे लागले. त्यामुळे सुनक यांना ही संधी चालून आली. अन्यथा लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच ऋषी सुनक यांच्याकडे हे पद जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्यांची त्यावेळची संधी हुकली; पण अगदी अल्पावधीतच त्यांना नियतीने पुन्हा ही संधी दिली आहे. आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या ब्रिटनला सावरण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे. मुळात ते श्रीमंत घरातले आहेत. ब्रिटनमधील अतिश्रीमंतांची 250 जणांची यादी अलीकडेच प्रकाशित झाली आहे. त्या यादीत सुनक यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही प्रचंड श्रीमंत आहेत. त्यामुळे या श्रीमंत लोकांना सर्वसामान्य लोकांच्या वेदना आणि संघर्ष कसा समजणार, असा आक्षेप त्यांच्यावर आतापासूनच घेतला जाऊ लागला आहे.
लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाबाबत असे लहानमोठे आक्षेप घेतले जाणे ही एक सामान्य बाब आहे. पण बहुसंख्य ब्रिटिश खासदारांचा ऋषी सुनक यांच्या कर्तबगारीवर विश्वास आहे. त्यांना ब्रिटनच्या मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्या आधारावर आणि कल्पक तसेच वेगळ्या कार्यशैलीच्या आधारे ते ब्रिटनला आपले सर्वोत्तम योगदान देतील यात शंका नाही. भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा त्यांना रास्त अभिमान असल्याचीही बाब प्रकर्षाने नमूद केली जात आहे. ब्रिटनच्या खासदारपदाची शपथ त्यांनी भगवद् गीतेला साक्ष ठेवून घेतली होती याचाही अनेकांनी आवर्जून उल्लेख केला आहे. आपल्या सासुरवाडीला म्हणजेच बंगळुरूला त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा भेट दिली आहे, त्यामुळे सध्याचा भारत त्यांच्या चांगल्या परिचयाचा आहे.
भारताचे सामर्थ्य आणि शक्तिस्थळांचाही त्यांना निश्चितच अभ्यास असावा. आयटी क्षेत्र, अंतरीक्ष क्षेत्र, कृषी क्षेत्रात भारत आज अत्यंत मजबूत स्थितीत असल्याने भारताचाही ते ब्रिटनसाठी अधिक चांगला उपयोग करून घेतील आणि त्यातून दोन्ही देशांना अधिक लाभ होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यास हरकत नसावी. ब्रिटन हा आजही आपल्यासाठी साहेबांचा देश मानला जातो. पण या साहेबांच्या देशाची सूत्रे मूळ भारतीय वंशाच्या हातात जाण्याने होणारा आनंद अनमोल आहे.