पाचवीपासून इंग्रजी शक्य नसेल तर इंग्रजीचे 12 तास घेण्याची मुभा द्या
पुणे, ता. 4 – जोपर्यंत माध्यमिक शाळांमध्ये पाचवी इयत्तेपासून इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था होत नाही, तेथपर्यंत एक तात्पुरता उपाय म्हणून दर आठवड्याला 8 तासांऐवजी इंग्रजीचे 12 तास ठेवण्याची माध्यमिक शाळांना परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई राज्य मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींनी मुंबई राज्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे केली. पाचवीपासून इंग्रजी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान कसे होत आहे हे पटवून दिले.
इराण बगदाद करारातून फुटणार
कराची – बगदाद करार संघटनेतून बाहेर पडून इराण रशियाशी 50 वर्षांचा अनाक्रमणाचा करार करणार, या बातमीने पाकिस्तानी परराष्ट्र खाते आश्चर्यमूढ बनले आहे. पाकमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तथापि, पाकच्या नभोवाणीवर इराण फुटणार नसल्याचे आवर्जून सांगण्यात आले.
संपूर्णतयः भारतीयांनी उभारणी केलेला भिलाईचा राष्ट्रीय पोलाद कारखाना सुरू
भिलाई – भिलाई पोलाद कारखान्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी केले. या कारखान्याच्या उभारणीसाठी 131 कोटी रुपये खर्च झाला आहे. राष्ट्रपतींनी बटन दाबताच भट्टीतून लोखंडाचा लाल रस बाहेर येऊ लागला.
उद्घाटनाचा प्रसंग पाहण्यास सुमारे 1 लाखापेक्षा अधिक लोक हजर होते. काल रूरकेला येथील पोलाद कारखान्याचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले. आज सरकारी मालकीचाच दुसरा कारखाना त्यांच्या हस्ते सुरू होत आहे.
सध्याच्या पोलाद कारखान्यांपैकी भिलाई एकच असा कारखाना आहे की त्याची बांधणी व उभारणी पूर्णपणे भारतीयांकडूनच होत आहे. रशियन तंत्रज्ञानाच्या देखरेखीखाली भारतीय स्थापत्य विशारदच ही कामे करीत आहे. या कारखान्यात 10 ते साडेबारा लाख अशुद्ध पोलाद तयार होईल.