लोकसंख्यावाढ रोखली नाही तर भारतापुढे भीषण आपत्ती
ब्रिटीश शास्त्रज्ञ सर हक्स्ले यांचा इशारा
नवी दिल्ली, ता. 15 – भारताने लोकसंख्या वाढीचा प्रश्न सोडविला नाही तर, सामाजिक व राजकीय दृष्टीने हानी होईल असा इशारा प्रख्यात ब्रिटीश शास्त्रज्ञ सर ज्युलियन हक्स्ले यांनी दिला. येथे विज्ञान भवनात भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन परिषदेत हक्स्ले बोलत होते. सर हक्स्ले म्हणाले, लोकसंख्येबाबत भारताची परिस्थिती मोठी आणीबाणीचीच आहे. भारत हा सर्वात मोठा मागासलेला लोकशाही देश आहे. केवळ आशियातच नव्हे तर जगातील मोठा देश आहे. लोकसंख्या प्रश्न सोडविण्यात अपयश म्हणजे राजकीय-सामाजिक विनाश! यश मिळाले तर मात्र आशियाचे नेतृत्व मिळण्याची संधी. जगही मग भारताकडे मोठ्या आशेने पाहू लागेल, असे शेवटी सर हक्स्ले यांनी मत व्यक्त केले.
भाडे नियंत्रण कायदा रद्द करण्याची मागणी
मुंबई – मुंबई राज्य घर मालक परिषदेचे दोन दिवसांचे अधिवेशन आज समाप्त झाले. सरकारने रिक्विझिशन केलेल्या जागा हळूहळू सोडाव्या आणि सध्याचे भाडेकरूंना सरकारनी बांधलेल्या व सरकारी मदतीवर उभारलेल्या घरांत जाण्याची सक्ती करावी अशी शिफारस केंद्र-राज्य सरकारला करणारा ठराव मंजूर केला. या प्रश्नाचा मुंबई सरकारने फेरविचार करून प्रथम बिगर कुटुंबीय घरे यातून मुक्त करावीत व दरम्यान कुटुंबाचे निवासासाठी वापरण्यात येणाऱ्या घरांवर भाडेवाढ करण्याची मुभा द्यावी.
पृथ्वी गरम होऊ लागली
वॉशिंग्टन – चालू शतकाचे सुरुवातीपासून पृथ्वीची उष्णता वाढत आहे असे हवामान तज्ज्ञांना वाटू लागले आहे. आंतरराष्ट्रीय भूगोल वर्षाच्या निमित्ताने अंटार्क्टिक प्रदेशात जी माहिती मिळाली त्यावरून हे अनुमान काढल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञाने सांगितले.