विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने भारत सरकार तयार करणार
नवी दिल्ली, ता. 11 – विद्युत शक्तीवर चालणारी रेल्वे इंजिन्स भारतात तयार करण्याचा रेल्वे खात्याने निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे खात्याचे उपमंत्री शहानबाझ यांनी आज लोकसभेत सांगितली. सरकारी क्षेत्रात विद्युत इंजिन्स व खासगी क्षेत्रातून डिझेल इंजिन्स तयार करावीत असे त्यांनी ठरविल्याचे निवेदन केले. भारतीय रेल्वेसाठी 110 विद्युत इंजिने परदेशातून मागविण्यात आली आहेत. त्यापैकी 10 इंजिनांचे सुटे पार्टस् येतील. ती येथे चित्तरंजन कारखान्यात जोडली जातील.
राज्यसरकारने केंद्राच्या तालावर नाचू नये
मद्रास – राज्य सरकारने केंद्र सरकारचे तालावर नाचू नये. स्वतःचे हक्क बजावण्याचे धोरण राखावे. राज्यातील जनतेच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आणि विरोधकांचे म्हणणे निर्विकारपणे विचारात घेऊन धोरणे ठरवावीत, असे काल मद्रास विधानसभेत विरोधी पक्षातर्फे सरकारला आवाहन केले.
निःस्वार्थ काम करणारी माणसे असतील तरच सहकारी शेती योजना यशस्वी होईल
वाराणशी – जनसेवेसाठी निःस्वार्थ काम करणारी माणसे असल्यावाचून सहकारी शेतीची योजना यशस्वी होणार नाही, असा सल्ला सर्वोदयवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी दिला आहे. काशी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी जयप्रकाश भाषण करीत होते. ते म्हणाले, “मी सहकारी चळवळीचा पुरस्कर्ता आहे. ही चळवळ अशा व्यक्तींचीच असावी. सध्या सहकारी संस्थांना लोकहिताची खरी कळकळ नसल्याने, सहकारी शेतीची योजना कार्यवाही केली तरी त्या संस्था सरकारच्या हातातील बाहुले होतील.
नीग्रो मुलांना शाळेत प्रवेश मिळाला!
अलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया) – गोऱ्यांचे शाळेत काल नीग्रो मुलांना प्रवेश मिळाला. काही गडबड झाली नाही. या प्रवेशप्रसंगी शाळांवर पोलीस पहारा होता. गोऱ्या पोरांनी या नीग्रो मुलांचे स्वागत केले नाही. त्यांनी उपेक्षा दर्शविली. कोर्टाच्या हुकुमाप्रमाणे सर्ववर्णी विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे अलेक्झांड्रिया हे व्हर्जिनियातील तिसरे गाव आहे.