आंध्रच्या राजकीय स्थैर्यावर देशाचे स्थैर्य अवलंबून
नवी दिल्ली, ता. 26 – “आंध्र प्रदेशामध्ये शक्य तितक्या लवकर जर राजकीय स्थैर्य स्थापन झाले नाही तर, सर्व देशांमधील राजकीय स्थैर्यावर याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही’, असे कॉंग्रेस सभासद बी. व्ही. राजू यांनी राज्यसभेत आपले मत मांडले. आंध्र प्रदेश हा उत्तर व दक्षिण भारतास जोडणारा दुवा असल्याने आंध्र प्रदेशाच्या राजकीय स्थैर्याला देशाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. चुकीच्या खर्चामुळे तसेच खर्चिक नियोजनामुळे राज्यांची स्थिती खराब झाली आहे, असेही ते म्हणाले.
कोतवालांचा राज्यभर सत्याग्रह होणार
पुणे – महाराष्ट्रातील कोतवाल 24 ऑगस्ट रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर सत्याग्रह करतील. कोतवालच्या चतुर्थ श्रेणीच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणी, भत्ते, सेवानिवृत्तीचे फायदे, कायम नोकरी याबाबत शासनाचे धोरण प्रतिकूल आहे म्हणून या मागण्या मान्य करण्यासाठी सत्याग्रह केला जाणार आहे.
जांबुवंतांची पुन्हा आंदोलनाची गर्जना!
मुंबई – “वेगळे विदर्भ राज्य हवे’ या मागणीसाठी आंदोलन करणारे महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे नेते व लोकसभा सदस्य जांबुवंतराव धोटे यांची आज तुरुंगातून सुटका झाली. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन केल्याबद्दल त्यांना तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागला. आपण लवकर पुन्हा वेगळ्या विदर्भासाठी निदर्शने करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी आज केली. ते म्हणाले, अन्नधान्याच्या आघाडीवर सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाविदर्भ संघर्ष समितीच्या आंदोलनाचा रोख शासनाच्या धोरणाविरुद्धही राहील.
लष्करी कायद्याच्या घोषणेची जरुरीच काय?
काबूल – अफगाणिस्तानमध्ये लष्करी कायदा जारी केल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले नाही. एक राज सत्ता जाऊन दुसरी राज सत्ता क्रांतीच्या मार्गाने आली, असे अधिकृत सांगण्यात आले.