भारत, बांगलादेश व पाकिस्तानात मैत्री निर्माण न झाल्यास आशिया-शांतता धोक्यात
ओटावा, ता. 18 – “”भारत, बांगलादेश व पाकिस्तान या तिन्ही देशांनी संशयरहित अशी मैत्री स्थापन केली नाही तर आशियातील शांतता व स्थैर्य धोक्यात येईल,” असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज येथे बोलताना केली.
त्या पुढे म्हणाल्या, पाकिस्तान सर्व प्रश्न चर्चा करून सोडवील, असे सिमला शिखर परिषदेत वाटल्यावरून 1971च्या युद्धात जिंकलेला सर्व प्रदेश भारताने पाकिस्तानला परत केला. पाकिस्तानने बांगलादेशाला मान्यता दिली असती तर सर्व युद्धकैदी यापूर्वी केव्हाच स्वतःच्या कुटुंबियात जाऊन राहू शकले असते. सैनिकच नव्हे तर नागरिकांचीही अदलाबदल करावी, ही सूचना आतापर्यंत पाकिस्तानने स्वीकारलेली नाही.
पुन्हा दारूबंदी केली! कामराजांचे मानले आभार
मद्रास – तामीळनाडू कॉंग्रेस (सं.) च्या मुख्य ठाण्यावर म्हणजे सत्यपूर्ती भवनात झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक बायका कडेवर लहान मुले घेऊन गोळा झाल्या व त्यांनी कामराजांचे आभार मानले. द्रमूक सरकारला दारूबंदी पुन्हा जारी करण्यास भाग पाडल्याबद्दल कामराजांना धन्यवाद दिले. दारूच्या व्यसनापायी त्यांची घरे सत्त्यानाशापासून वाचविली म्हणून त्यांनी त्यांचे मनोमन आभार मानले.
25 प्राचीन मूर्ती सापडल्या
बडोदा – भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याने उत्तर गुजरातमधील पाटण येथील नवव्या शतकातील “राणीका वाव’ या भागाचे उत्खनन केले. तेव्हा भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा, भगवान महादेवाच्या 25 प्राचीन मूर्ती सापडल्या.