पीकविमा योजना हवी – ना. यशवंतराव चव्हाण
मुंबई, ता. 9 – पीकविमा योजनेला प्राधान्य देऊन ती देशभर लागू करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. “सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयीकरण ः आव्हान स्वीकारले’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन चव्हाण यांनी केले. यावेळी चव्हाण म्हणाले, “भारतीय शेतकरी मान्सून पावसावर अवलंबून आहे. त्याला काही संरक्षण दिले पाहिजे.’
सैनिकाच्या उदात्त पेशात, आरामास मुळीच वाव नाही
पुणे- जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर कष्टाची कास धरा, असा सल्ला भारतीय लष्कराचे प्रमुख जन. जी. जी. बेवूर यांनी आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेच्या 44व्या अभ्यासक्रमातील छात्र सैनिकांस दीक्षांत संचलन प्रसंगी केलेल्या भाषणात दिला. ते म्हणाले, सैनिकाच्या उदात्त पेशात आरामास मुळीच वाव नसतो.
मुंबईस आणखी बारा दिवस विजेची तीव्र टंचाई?
मुंबई – ट्रॉम्बे येथील एक युनिट निकामी झाल्याने येथे 12 दिवस मुंबई नगरीस तीव्र वीज टंचाईस तोंड द्यावे लागणार आहे. वीज पडल्याने हे युनिट थांबले आहे. कोयना परिसरात येत्या दोन दिवस भरपूर पाऊस झाला तर मात्र अधिक वीज देता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
वीज नाही : मुंबईतील कारखान्यांस सुट्टी
मुंबई – शहरातील सर्व कापडगिरण्या आणि कारखाने आज वीज नसल्याने बंद ठेवावे लागले. विजेच्या तारांवर वीज पडून त्या तुटल्याने वीज पुरवठा झाला नाही.
नटराजाची मूर्ती सापडली
कलकत्ता – हजार वर्षांपूर्वीची “नटराजा’ची अमोल किमतीची मूर्ती काल कलकत्ता विमानतळावर पकडण्यात आली. दक्षिण भारतातून ती चोरीस गेली होती. अमेरिकेत पाठविण्यासाठी विमानतळावर आणण्यात आली होती.